करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. राज्यात आज ५ हजार ८५९ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ३० हजार १३७ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७४,४८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे राज्यात ५ हजार ५३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शुक्रवारी १८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९१,७२,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४१,७५९ (१२.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३५,५१६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू होणार; शालेय शिक्षण मंत्र्यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!

मुंबईत गेल्या २४ तासात ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे ४०७ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १४ हजार १६६ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. सध्या मुंबईत ४ हजार ३४५ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर हा १ हजा ६३१ दिवसांवर पोहोचला आहे. कोविड वाढीचा दर ३० जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान ०.०४ टक्के इतका होता.