शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवार यांची ईडी चौकशी ही राजकीय सूडभावनेने झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला होता. त्यांच्या या आरोपाला प्रतिउत्तर देताताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना (दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) झालेल्या अटकेची आठवण करुन दिली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती. आमच्या मंत्रीमंडळातील काही वरीष्ठांच्या हट्टापायी ही अटक झाली होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, असेही म्हटले होते. त्यावेळी आमच्या मताला किंमत नव्हती. त्यामुळे तो निर्णय मागे घ्यायला लावू शकलो नाही, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘बाळासाहेबांच्या अटकेविषयी आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीला विचारलं की असे का करताय, तेव्हा ते म्हणाले, की आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत. आम्हाला योग्य वाटतो तो निर्णय आम्ही घेणार आहोत.’ या मुलाखतीवेळी अजित पवार यांनी एकाही नेत्याचं उघडपणे नाव घेतलं नाही. मात्र, बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा छगन भुजबळ हे तत्कालीन गृहमंत्री होते. त्यामुळे पवार यांनी त्यांच्याकडेच बोट केल्याची चर्चा आहे.