रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे आणि शहरातील इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेली सभा सत्ताधारी पक्षाचे आमदार व पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी रविवारी उधळून लावली. दोनशे ते तीनशे नागरिक उपस्थित असलेल्या या सभेत सामंत समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे येथील वातावरण चांगलेच तापले. सामंत समर्थकांच्या या प्रवृतीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

रत्नागिरी शहरात खड्डे पडलेल्या रस्त्यामुळे अनेकजण त्रस्त झालेले आहेत. याबद्दल कोणती भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी जमलेल्या रत्नागिरीतील नागरिकांना सामंत समर्थकांनी रोखले आणि सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. सामान्यांचा आवाज दाबण्याचा केलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आणखी वाचा-Samit Kadam On Anil Deshmukh : “….म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो”; अनिल देशमुखांनी नाव घेतलेल्या समित कदमांनी केला खुलासा!

भारतीय जनता पार्टीसह अनेकांनी शहरातील खड्ड्यात झाडे लावून आंदोलने केली, निषेध व्यक्त केला आहे. मात्र रत्नागिरी नगर परिषद आणि या रस्त्यांचा ठेकेदार यांच्या कारभारावर अंकुश आणण्यासाठी आणि रस्त्यावर होणारा छळ थांबवण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची यासाठी रविवारी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील एका हॉटेलमध्ये दोनशे ते तीनशे रत्नागिरीकर नागरिक जमा झाले होते. ही सभा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरू होणार होती. मात्र त्याआधीच अर्धातास सभास्थानी सामंत समर्थक शिवसेना पदाधिकारी राहुल पंडित, राजन शेट्ये, बिपिन बंदरकर व अन्य तिथे जमले. महिला आणि पुरुषांचा साधारण शंभर जणांचा जमाव हॉटेलच्या रूममध्ये शिरला आणि आम्हालाही बोलायचे आहे असे सांगून रस्त्याबद्दल बोलणाऱ्या लोकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. सामंत समर्थक आत आल्यावर रूममधे असलेल्या लोकां व्यतिरिक्त सभेसाठी येणाऱ्या, कोणालाही त्यांनतर आत येऊ दिले नाही. त्या रूमचा दरवाजा सुध्दा बंद केले. कुणालाही आत येऊ न दिल्याने आणि सभेत असलेल्याना बोलूच न दिल्याने ही सभा अर्धा तासातच संपली.

आणखी वाचा-रोहित पवारांची अजित पवारांवर टीका; म्हणाले, “महायुतीत त्यांना २० ते २२ जागा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी शहरात पडलेले खड्डे आणि ते बुजवण्याचा रत्नागिरी नगर परिषदेचा केविलवाणा प्रयत्न रोज रत्नागिरीतील नागरिक पाहत आहेत. रस्त्यांच्या कामात अक्षम्य चुका झाल्या असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजकीय बॅनर शिवाय एकत्र आलेल्या सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आता रत्नागिरीत सुरू झाली आहे. तर आज जरी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला असला तरीही याहीपेक्षा मोठा तीव्र विरोध करण्यासाठी आता थेट रस्त्यावरच उतरायचे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.