मोहन अटाळकर, लोकसत्ता अमरावती : विस्तृत प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आलेला असताना महत्त्वाकांक्षी तापी महाकाय पुनर्भरण योजनेला (तापी मेगा रिचार्ज) मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. गोदावरी व तापी खोऱ्यातील सहा नद्या केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत एकमेकांना जोडून पूरपरिस्थिती व दुष्काळावर मात करण्याची क्षमता या योजनेत असल्याचे सांगण्यात येत आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना कागदांवरच आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनीला या योजनेचा फायदा मिळू शकेल. नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून या योजनेला केंद्र सरकारकडून शंभर टक्के निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मूळ योजनेचे काम ६ हजार १६८ कोटी रुपयांचे असले, तरी या योजनेची किंमत आता दहा हजार कोटींवर पोहचली आहे. जिल्ह्यात दहा मोठय़ा व चौदा लहान अशा २४ नद्या वाहतात. तरी दरवर्षी भूजल पातळी कमी होत असल्यामुळे तसेच काही तालुक्यांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. कमी पावसामुळे काही धरणे, बंधारे कोरडे राहतात. जिल्ह्यातील तापी, पूर्णा, पेढी आणि गोदावरी खोऱ्यात वाहणाऱ्या या नद्यांना जोडण्याचे प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुके ड्राय झोन असून, चांदूर बाजार व अचलपूर तालुके अतिशोषित आहेत. भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुके खारपाणपट्टय़ातील आहेत. केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत या तालुक्यांची निवडही झालेली आहे. मात्र, यावर पाहिजे त्या गतीने काम होत नाही. परिणामी, जिल्ह्यात दुष्काळाचे सतत सावट असते. जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रांपेक्षा अधिक संत्रा लागवडीखाली आहे. जिल्ह्यात वेळेवर पाऊस येत नसल्याने संत्रा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील सहाही नदीचा परिसर मध्यम सपाट उंचीच्या भागाचा आहे. सर्वच नद्यांचे पाणलोट क्षेत्र भिन्न असल्याने एकाच वेळी सर्वच नद्यांना पूर येत नाही. शिवाय तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात तापीचे पाणी अचलपूर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे. पश्चिामवाहिनी पेढी, पूर्णा, पिली, शहानूर, चंद्रभागा या नद्या पुढे तापीला तर पूर्ववाहिनी वर्धा ही प्राणहिता व नंतर गोदावरीला मिळते. पूर्वेकडील राजुरवाडी येथील वर्धा नदी व पश्चिामेकडील शहानूर नदी (ता. अचलपूर) यांचे एका आडव्या रेषेत सर्वात कमी अंतर आहे. या रेषेला छेदून पेढी, पूर्णा, पिली व चंद्रभागा नद्या वाहतात. त्या एकसमान जल पातळीच्या कालव्याने एकमेकांना जोडल्यास सर्व नद्या आपापल्या क्षमतेने किंवा बारमाही समान वाहून पूरपरिस्थितीचे नियोजन होऊ शकते. परिणामी, अतिशोषित व ड्राय झोन तालुके आणि खारपाणपट्टय़ातील अंजनगावसुर्जी, दर्यापूर व भातकुली अशा सहा तालुक्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. जलशक्ती अभियानांतर्गत व्यवहार्यता तपासणीसाठी सकारात्मक शास्त्रोक्त अभ्यासाची आवश्यकता आहे. जिल्ह्य़ात वर्धा, पूर्णा, सपन, चंद्रभागा, शहानूर, शक्ती, पेढी, गडगा, बेंबळा, तापी, चारगड, भुलेश्वारी, कोल्हाड, भानामती, नाद, विदर्भा, भोगवती, रायगड, बेला, जिनवा, दाटफाडी, पाक, चुडामन, बिच्छन, बोट, वादी, बुटी, बोदील, सिपना, खापरा, स्वारू, वान, डोलारा, देवना या नद्या आहेत. वरुड तालुक्यात २१ हजार ३४६ हेक्टर, चांदूर बाजारमध्ये ११,१९६, मोर्शी ११,२२५, तिवसा ३०७५, अचलपूर ११,१९७, तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५,४१२ हेक्टर क्षेत्रात संत्री बागा आहेत. या सिंचन सुविधेचा लाभ संत्रीबागांना मिळू शकेल. सिंचन क्षमतेमध्ये होईल वाढ पावसाळ्यात तापी नदीचे पुराचे पाणी मध्यम प्रकल्प तसेच डाव्या कालव्यांद्वारे महाराष्ट्र राज्यातील धारणी, अचलपूपर्यंत नदी नाल्यात सोडून, भूमिगत बंधारे, गॅबियन बंधारे, पुनर्भरण विहिरी, पुनर्भरण दंड, (शाफर) इंजेक्शन वेल्स व साठवण बंधारे बांधून त्यांचे पुनर्भरण करून खोल गेलेली भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासोबतच निर्माण होणाऱ्या पाणी साठय़ाद्वारे सिंचन क्षमता वाढवता येतील. ठळक वैशिष्टय़े १ ) मौजे खारीया, घुटीघाट, ता. धारणी येथे वळण बंधारा बांधकाम. मुख्य बंधाऱ्यांची लांबी १.२८ किमी व उंची २२ मीटर, १५ बाय १२ मीटरचे २२ दरवाजे. प्रकल्पाची एकंदर किंमत १० हजार ७०० कोटी. २ ) बुडीत क्षेत्र मध्य प्रदेशातील १४९५ हेक्टर व महाराष्ट्रातील २२८८ हेक्टर (खासगी १६२१ हेक्टर, शासकीय ३३८ हेक्टर, वनजमीन ३२३ हेक्टर. ३) पाणीसाठा २३५.६० दलघमी, पाणी वापर महाराष्ट्रात १९.३७ टी.एम.सी. व म.प्र. ११.७६ टीएमसी, या योजनेतून पुनर्भरणाद्वारे अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष फायदा महाराष्ट्रातील २ लाख ३४ हजार ७०६ हेक्टर व म.प्र.तील १ लाख २३ हजार ०८२ हेक्टर असे एकूण ३ लाख ५७ हजार ७८८ हेक्टर राहणार आहे. ४ ) वळण बंधाऱ्यावरून उजवा कालवा २२१ किमी (म.प्र.) व डावा कालवा धारणी ते इच्छापूर व जोड बोगदा ते अचलपूर एकूण २७६ कि.मी. प्रस्तावित आहे. या योजनेचे सर्वेक्षण व अन्वेषण जवळपास पूर्ण झालेले आहे. ५) ५ प्रकल्प अहवाल त्वरित सादर करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे कोणतेही गाव बाधित होत नसून पुनर्वसनाची आवश्यकता राहणार नाही यावर विशेष भर देण्यात आला आहे. तापी नदीचे पाणी अचलपूर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा शहानूर नदीजोड प्रकल्प राबवल्यास संपूर्ण परिसर ‘सुजलाम सुफलाम’ निश्चितपणे होऊन शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होईल. जिल्ह्य़ातील लाखो नागरिक शेतकऱ्यांच्या हिताचा महाकाय नदीजोड प्रकल्प सकारात्मक दृष्टिकोनातून राबवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - बच्चू कडू, जलसंपदा राज्यमंत्री