कृष्णा नदीतील प्रदुषणाला जबाबदार धरून दत्त इंडिया साखर कारखान्याचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश प्रदुषण नियंत्रण मंडळाने सोमवारी दिले, तर वारंवार इशारा देऊनही साडपाणी नदीमध्ये सोडले जात असल्याने महापालिकेला फौजदारी कारवाईपूर्व नोटीस बजावण्यात येत आहे.
कृष्णा नदी प्रदुषणामुळे चार दिवसापुर्वी लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला. याच्या चौकशीअंती जलप्रदुषणास दत्त इंडिया साखर कारखाना व महापालिका जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सोमवारी प्रादेशिक कार्यालयात सुनावणी निश्चित घेण्यात आली.
वसंतदादा साखर कारखाना भाडे करारावर चालविणार्या दत्त इंडिया कारखान्याचे रसायनयुक्त पाणी वाहून नेणारी नलिका फुटल्याने दुषित पाणी शेरीनाल्यात मिसळल्याचे आढळून आले. तर महापालिकेचे सांडपाणीही शेरीनाल्यातून वाहत असल्याचे आढळले. दुषित पाणी कृष्णा नदीत मिसळले. यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणीवरून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी दत्त इंडियाला कारखाना बंद करण्यासाठी वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण व जलसंपदा विभागाला आज देण्यात आले. तर महापालिकेला नदी प्रदुषणास जबाबदार धरून फौजदारी का करू नये अशी खटला पूर्व नोटीस बजावण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी सांगितले.या प्रकरणी कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली.