केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ ही मोहिम सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून या यात्रेचा प्रारंभ केला. यावरून आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो ऐवजी, काँग्रेस छोडोची चिंता केली पाहिजे, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. त्यावर विखे पाटील म्हणाले, “सत्ता गैल्याचं वैफल्य काही जणांना आलं आहे. त्याच वैफल्यातून राज्य सरकावर टीका केली जात आहे. त्याकडे आपण फार लक्ष देण्याची गरज नाही आहे,” असे प्रत्युत्तर विखे पाटील यांनी विरोधकांना दिलं आहे.

“गेल्या सरकारसारखं माझे कुटुंब तुमची जबाबदारी…”

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यावरती बोलण टाळत विखे पाटलांनी म्हटलं की, “प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सक्षमपणे काम करत आहे. सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतली आहे. गेल्या सरकारसारखं माझे कुटुंब तुमची जबाबदारी असे करणार नाही,” असा टोलाही महाविकास आघाडी सरकारला विखे पाटलांनी मारला आहे.

दरम्यान, भारत जोडो यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीपेरुबंदर येथे जाऊन माजी पंतप्रधान आणि त्यांचे पिता राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन चापुष्पांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रेचा आरंभ झाला. यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा सोपवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.