महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकारण्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे, असं भाकितही केलं. त्यांनी रविवारी (१७ सप्टेंबर) ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे म्हणाले, “आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता, तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.”




“पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार”
“पण हे करताना फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे आणि यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
“मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे”
“अशावेळेस एकाने आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्याने टीका करायची. तसेच टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल, तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
“तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे.”
हेही वाचा : “माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की…”; मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले…
“तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर…”
“मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा,” असं म्हणत राज ठाकरेंनी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली.