महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ( २३ फेब्रुवारी ) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.

हे पण वाचा- बाळासाहेब ठाकरेंचा एक आदेश आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्रिपद सोडलं, काय घडलं होतं तेव्हा?

मनोहर जोशींच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसंच शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रुपाने पूर्ण झालं असंही म्हटलं आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेत कसे आले मनोहर जोशी?

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले. फक्त आलेच नाहीत तर ते तिथे खूप मोठेही झाले. मनोहर जोशी यांनी मागे वळून पाहिलं नाही. १९६४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. कोणताही राजकीय विचार नसताना, राजकारणात येण्याचा विचार नसताना ते शिवसेनेत आले. १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळखही नव्हती. १९६७ च्या डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती. त्यावेळी श्रीकांत ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड करत असत. मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमवी केली आणि पुण्याला जाण्याची तयारी केली. घरातली कार बाळासाहेब ठाकरे हे आधीच पुण्याला घेऊन गेले होते. आता रेकॉर्डिंगची सगळी तयारी बस किंवा ट्रेनमधून कशी नेणार? त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला. मनोहर जोशींनी कुठलेही आढेवेढे न घेता होकार दिला. मनोहर जोशी हे आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेंना घेऊन पुण्यात पोहचले. पुण्यातली सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट शनिवार वाडा परिसरात घडवून आणली. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मनोहर जोशी शिवसेनेत आले.