महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राहुल गांधी केवळ सुरक्षा रक्षकांचं ऐकत असल्यामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या नेत्यांऐवजी राज ठाकरेंना सल्ले देत आहेत,” असा शाब्दिक हल्ला गजानन काळेंनी केला. तसेच मनसेपेक्षा काँग्रेसला सोडून जे नेते चालले आहेत त्यांची काळजी करा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

गजानन काळे म्हणाले, “आटा किलोमध्ये मिळतो की लिटरमध्ये याचं भान नसलेल्या राहुल गांधींचं प्रबोधन करण्याऐवजी बाळासाहेब थोरात राज ठाकरेंना सल्ले देत सुटले आहेत. काँग्रेसमधील जुनेजाणते नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाला कंटाळून पक्ष सोडत आहेत.”

“राहुल गांधी केवळ सुरक्षा रक्षकांचंच ऐकतात”

“राहुल गांधी केवळ सुरक्षा रक्षकांचंच ऐकतात असे आरोप त्यांच्यावर होतात. सुरक्षरक्षकांचं ऐकत असताना बाळासाहेब थोरातांचं ऐकलं जात नाही. त्यामुळे थोरात त्यांच्या नेत्यांना सल्ले देण्याऐवजी राज ठाकरेंना सल्ले देत सुटले आहेत,” असं म्हणत गजानन काळेंनी टोला लगावला.

हेही वाचा : “मोदी-शाहांना देशाच्या राजकारणातून हद्दपार करा असं म्हणूनही भाजपा नेते राज ठाकरेंच्या घरी”, शिवसेनेचा निशाणा

“बाळासाहेब थोरात यांच्या सल्ल्याची गरज नाही”

“राज ठाकरे आणि मनसेला बाळासाहेब थोरात यांच्या सल्ल्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. तसेच मनसेपेक्षा काँग्रेसला सोडून जे नेते चालले आहेत त्यांची काळजी केली तर ते त्यांच्यासाठी चांगलं होईल,” असंही गजानन काळेंनी नमूद केलं.