मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले आहे. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने तसेच राज्यात काही भागांत सुरू होत असलेल्या एसटी आणि महामंडळाने कारवाईत केलेली वाढ याला काही भागांतून विरोधही वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवारी ११ हून अधिक एसटी गाडय़ांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यात चालक, वाहकही जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एसटी महामंडळाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, महामंडळाने निलंबनाची कारवाईही अधिक तीव्र केली असून शनिवारी ३ हजार १० कर्मचारी निलंबित केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

राज्यातील विविध आगारांतून सुटणाऱ्या एसटी गाडय़ांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे; परंतु आगारातून सुटताच काही अंतरावर जाताच एसटीवर दगडफेक केली जात आहे.

३ हजारांवर चालक, वाहक रुजू

शनिवारी एकाच दिवसात ३ हजार २१५ चालक आणि वाहक कामावर परतले. त्यामुळे आतापर्यंत ४ हजार २४२ चालक आणि वाहक पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याची नोंद आहे. तर विविध विभागातील एकूण १८ हजार कर्मचारी कर्तव्यावर आल्याची माहिती महामंडळाने दिली. कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येत्या आठवडय़ात महामंडळाकडून कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  राज्यात एसटी धावण्याचे प्रमाण आणखी वाढले. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ हजार ४६ एसटी धावल्या.

‘संप मागे घ्या’

तुटेपर्यंत ताणणे हितावह नाही, असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने एसटीतील संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे. २८ एसटी कामगार संघटनांच्या एकजुटीतून मोठा दबाव आणल्यानेच ४१ टक्के वेतनवाढ करणे शासनाला भाग पडले आहे. हे कर्मचाऱ्यांचे यश आहे.