मुंबईच्या विकासाचं विमान हे अडीच वर्षे अहंकारामुळे रनवेवर रखडलं होतं. आता विकासाचं विमान भरारी घेतं आहे कारण गतीमान सरकार आलं आहे. कुणाच्या तरी अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली होती, मुंबईचा विकास रखडला होता हे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आज आपण मुंबईत विकासाची कामं पाहिली तर गेल्या नऊ महिन्यात आपण म्हणजे या सरकारने एवढे निर्णय घेतले की ते लोकांच्या समोर आहेत. पंचामृत अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. ठराविक लोकांच्या अट्टाहासामुळे रखडलेल्या मेट्रोच्या कामाला आपण गती दिली आहे. आरे कारशेड, मेट्रो तीन हे कुणामुळे थांबले होते? आपल्याला माहित आहे. मात्र आपलं सरकार आल्यानंतर आपण तातडीने निर्णय घेतला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं आमचं गतीमान सरकार
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं आमचं गतीमान सरकार आहे. त्यामुळे अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे आणि पायाखालची जमीन सरकरली आहे. शेतकरी बांधवांनाही आपल्या सरकारवर विश्वास आहे.विकासाची संकल्पना घेऊन सरकार पुढे चाललं आहे.आपलं सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार आहे. फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपण सरकार चालवत नाही. यापूर्वीचा काय अनुभव होता ते सगळ्यांना माहित आहे.
मुंबईच्या विकासाचं विमान रखडलं होतं
मुंबईच्या विकासाचं विमान गेल्या अडीच वर्षापासून आडमुठ्या आणि अहंकारी धोरणामुळे एअरपोर्टच्या रनवेवर रुतलं होतं. मात्र आपलं सरकार आल्यानंतर विकासाच्या विमानाने टेक ऑफ घेतला आहे. आपण पुढे जात आहोत. त्यामुळे अनेकांना पोटदुखी होते आहे. रखडलेल्या प्रकल्पांना आपण गती देत आहोत. मेट्रोची कामं, रस्त्यांचं काँक्रिटीकरण अशा अनेक कामांनी वेग घेतला आहे. मुंबई सुंदर आणि स्वच्छ होते आहे. गेली अनेक वर्षे जी कामं झाली नाही ती आम्ही करतो आहोत. खड्डे मुक्त मुंबईचा आपला निर्णय आहे जी दिसत आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना टोला?
“मुंबईत आपण रोषणाई केली. त्यावर काही लोक बोलले. मात्र ही रोषणाई कायमची आहे तात्पुरती नाही.मुंबईच्या विकासाची जी तळमळ आहे त्यातून आम्ही हे केलं आहे.”
उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे अनेक प्रकल्प रखडले
एका व्यक्तीच्या अहंकारामुळे राज्यातले प्रकल्प रखडले होते. अडीच वर्षे प्रकल्प रखडल्याने तुम्ही राज्याला १० वर्षे मागे नेण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच आम्ही या प्रकल्पांना गती दिली आहे. बुलेट ट्रेनचा विषय अडीच वर्षे कुणी थांबवला? का थांबवला? आपल्याला माहित आहे. मुंबईसाठी इतका मोठा असलेला प्रकल्प पण त्यातही काहींनी खोडा घातला. गेल्या अडीच वर्षात मेट्रो प्रकल्प एक इंच पुढे सरकरला नव्हता. आपलं सरकार आल्यानंतर हा प्रकल्प वेगाने पुढे जातो आहे. त्यांनी बीकेसी मधली जागा उपलब्ध करून दिली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. यातले अडथळे दूर केले आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं.