राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत असून त्यासाठी विद्यमान तीन नगरसेवकांनी शड्डू ठोकले आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान उपनगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, भाजपचे उमेदवार आणि माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बावधनकर आणि शिवसेनेचे उमेदवार आणि पालिकेतील विद्यमान विरोधी गटनेते अभय मेळेकर यांचा समावेश आहे. पक्षाच्या जोडीने या तीनही उमेदवारांचा शहरामध्ये दांडगा जनसंपर्क असून स्वतंत्ररीत्या त्यांचे नेतृत्व मानणारा लोकवर्ग आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. थेट लोकांमधून निवडल्या जाणाऱ्या येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीसाठी आघाडीने विद्यमान उपनगराध्यक्ष काझी, शिवसेनेचे विरोधी गटनेते मेळेकर, तर भाजपने काँग्रेसमधून डेरेदाखल झालेले आणि माजी उपनगराध्यक्ष बावधनकर यांना रिंगणात उतरविले आहे. गेली सुमारे दहा वर्षे नगरसेवक असलेले काँग्रेसचे उमेदवार काझी यांनी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर चांगलीच छाप पाडलेली आहे. शहराच्या विकासाबाबत सभागृहामध्ये होणाऱ्या चर्चेमध्ये मुद्देसूद मांडणी करीत म्हणणे मांडणाऱ्या काझी यांनी आपल्या कर्तृत्वाचा आलेख नेहमीच उंचावत ठेवला आहे. तालुक्याच्या सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत राहताना त्यांना अनेकांना सहकार्याचा हात दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार मेळेकर यांनी सभागृहामध्ये समर्थपणे विरोधी गटनेता म्हणून भार सांभाळला आहे. नगरपालिकेमध्ये विरोधी गट अल्पमतामध्ये असूनही त्यांनी बहुमतामध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या एकलांगी आणि शहराच्या विकासाला मारक ठरणाऱ्या निर्णयांना विरोध केला. विरोधी गटामध्ये असूनही पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या साथीने त्यांनी काही निधीही शहराच्या विकासाला आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेली पाच वर्षे काँग्रेसचे नगरसेवक आणि त्यानंतर उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बावधनकर यांनी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन स्वागत केले. उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना बावधनकर यांनीही शहरामध्ये चांगलीच छाप पडली आहे. एकमेकांना तोडीस तोड असलेल्या या तिन्ही उमेदवारांमुळे नगराध्यक्षपदाची निवडणूकच चांगलीच प्रतिष्ठेची झाली आहे. या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.