नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना मंगळवारी पहाटे घडली. खरबी येथील दोन गुडांची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली असून या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून टोळीयुद्धातून हत्या झाल्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे. संजय बनोदे, बादल शंभरकर, राजेश यादव हे तिघे मंगळवारी पहाटे दिघोरी उड्डाणपुलावरुन खरबी येथे दुचाकीवरुन जात होते. यादरम्यान लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ त्यांना एका स्विफ्ट कारने धडक दिली. या धडकेमुळे तिघेही दुचाकीवरुन खाली पडले. यानंतर कारमधून चार हल्लेखोर उतरले. त्यांनी लोखंडी रॉडने तिघांना मारहाण केली. संजय आणि बादलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या राजेश यादवला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. कार बंद पडल्याने हल्लेखोरांनी कार तिथेच सोडून पळ काढला. हत्येची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी या आधारे तपास सुरु केला आहे. पांढराबोडीतील सेवक मसराम टोळीशी संजय बनोदेचा वाद होता. या वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.संजय, बादल आणि राजेश या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. दरम्यान, यापूर्वी खापरखेडा येथे अवैध धंदे आणि त्यातील पैशाच्या वाटणीवरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली. आकाश पानपत्ते (वय २७) असे या मृत तरुणाचे नाव होते. कोळसा चोरी व अवैध विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याचा अंदाज होता.