हमखास नोकरीची शाश्वती देणाऱ्या आणि अनेक मान्यवर कंपन्यांचा सतत राबता असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनमधील ९० टक्के पदविकाप्राप्त विद्यार्थी कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये निवड होऊनही कंपनीत रूजू होत नसल्याने कॅम्पसला येणाऱ्या कंपन्यांची संख्या रोडावली आहे.
इस्पात, टाटा मोटर्स, एल अ‍ॅण्ड टी, व्होल्टाड, व्हिडिओकॉन, नेट लॉग, टाटा स्टिल आदींसारखा नामवंत कंपन्या दरवर्षी शासकीय तंत्रनिकेतनमधील पदविकेच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटव्ह्र्य़ूसाठी नागपुरात येत असतात. २००६-०७मध्ये ३१ कंपन्यांनी तंत्रनिकेतनला भेट दिली होती. अलीकडे ही संख्या रोडावली आहे. त्यामध्ये २००८मध्ये २५ कंपन्या आल्या होत्या. २००९मध्ये २२ कंपन्या, २०१०मध्ये २० कंपन्या, २०११-१२मध्ये १४ तर २०१२-१३मध्ये केवळ दहा कंपन्यांनी कॅम्पस इंटव्ह्र्य़ूसाठी उत्सुकता दाखवली. कंपन्यांची विद्यार्थ्यांना पदविका स्तरावरील नोकरी देण्याची तयारी असली तरी विद्यार्थी त्यापुढील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास उत्सुक असतात.
मुलाखतीच्यावेळी पदविकेचे विद्यार्थी उत्साही असतात. अनुभवासाठी ते मुलाखतीला उपस्थित राहतात. त्यामुळे कंपन्या खर्च करून विशिष्ट जागांसाठी पदविकेच्या विद्यार्थ्यांची निवड करतात. पण विद्यार्थी रूजू होत नाहीत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूकही वाढली आहे. ते केवळ पदविकेवर समाधान न मानता पुढील शिक्षणासाठी पदविकेचा उपयोग करतात. दहावी करून तीन वर्षांचे तंत्रशिक्षण आणि त्यानंतर तीन वर्षांचे पदवी शिक्षण असे सहा वर्षांत बीई होते. दुसऱ्या बाजूने अकरावी व बारावीनंतर चार वर्षांचे बीई करूनही तेवढाच कालावधी लागतो. तंत्रशिक्षण घेऊन विद्यार्थी बीई करण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच हल्ली अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम ही पदवी शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण पायरी बनली आहे. त्यामुळे ९० टक्के विद्यार्थी अभियांत्रिकी पदविकेचे तीन वर्षांचे शिक्षण घेऊन पदवी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत प्रवेश मिळवतात. पदवीचे शिक्षण घेण्यामागे इतरही घटक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरतात. त्यामध्ये शिष्यवृत्ती, झटपट लोन, घसरलेली टक्केवारी इत्यादी.
 या संदर्भात शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी आर.ई. गजभिये म्हणाले, पदविका उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थी पदवी अभियांत्रिकीला प्राधान्य देतात. एक अनुभव म्हणून ते कॅम्पस इंटरव्ह्य़ूला सामोरे जातात. त्यांची निवडही होते. मात्र, निवड होऊनही रूजू होत नाहीत. पदविका पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांचा पाया पक्का झालेला असतो. त्यांना थेट पदवीच्या दुसऱ्या वर्षांत प्रवेश मिळतो. महत्त्वाचे म्हणजे पूर्वीप्रमाणे पदविकेची ६० टक्क्यांची अट शिथिल होऊन ती ५० टक्के झाली आहे. त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा संधी आहे तर पदवी अभियांत्रिकी करण्याची हौस विद्यार्थी पूर्ण करतो. पूर्वी ५५ ते ५९ टक्के गुण असलेले उच्च श्रेणीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेता येत नसल्याने ते नोकरीवर रूजू व्हायचे. आता ५० टक्केवाल्यालाही बीई करता येते. त्यामुळे नोकरी न करता बीईला प्राधान्य देतो. इतरही कारणे म्हणजे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी लागणारे शिक्षण कर्ज मिळणे सोपे झाले आहे. खुला वर्ग सोडला तर सर्वाना उच्च शिक्षणासाठी सवलत आहे. महाविद्यालयेही एकदम शुल्क न घेता तीन-चार हप्त्यांमध्ये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची मुभा देतात त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीकरणे सोपे जाते. सर्वात महत्त्वाचे पालकांचा आर्थिक स्तर उंचावल्याने पदविकेच्या आधारे नोकरी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे.