राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय तर संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच या पराभवाच्या निमित्ताने भाजपाचे अनेक नेते महाविकास आघाडीवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

हेही वाचा >>>> ‘…तर शरद पवार यांच्या नावाला आमचा पाठिंबा,’ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे भाष्य

“आतापर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत असे म्हणत होते. जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रुपण झाली,” अशी खोचक टीका राणे यांनी केली.

हेही वाचा >>>> ‘संजय राऊतांना सत्तेचा माज आलाय, त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केला’- अनिल बोंडे

तसेच राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला. “शिवसेना सांगत होती की तीन जागा जिंकणार पण शेवटी काय झालं? संजय राऊतदेखील काठावर पास झाले. आमच्या हातून संजय राऊत वाचले. ते सत्तेत आहेत. त्यांना महाविकास आघाडीची मते मिळायला हवी होती. तेवढीही मते त्यांना मिळली नाहीत. मला सांगायचं आहे की तुम्ही अल्पमतात आलेले आहात. नैतिकतेचं भान असेल तर राजीमाना द्या आणि बाजूल व्हा,” अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

हेही वाचा >>>> ‘संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला,’ किरीट सोमय्यांचा आरोप; निवडणूक आयोगाने दखल घेण्याची केली मागणी

तसेच, “तुम्ही महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेलंत. सत्तारुढ आणि विरोधक यांच्यात लोकशाहीमध्ये जे नातं असतं हे नातं तुम्ही या निमित्ताने धुळीला मिळवलं. तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही. स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत आणि बढाया मारतात,” अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.