Narhari Zirwal : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला संबोधित केलं. मराठी साहित्य परिषदेच्या बोधचिन्हाचे राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी त्यांनी आजच्या साहित्यिक आणि कवींवर नाराजी व्यक्त करत राजकारण्यांवरही टीका केली. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस झाली आहे असं राज ठाकरे म्हणाले होते. नरहरी झिरवाळ ( Narhari Zirwal ) यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“आज महाराष्ट्राचा राजकारणाचा खेळ झाला आहे, महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदुषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारतंय. खरंतर महाराष्ट्रातील राजकारणात असे लोक आहेत, ज्यांनी जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत. पण ज्या प्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय, कशाला काही धर्बंध नाही, अशा गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत. तिथं त्यांचे कान धरून शिकवणं, समजावणं हे तुमचं सर्वांत मोठं कर्तव्य आहे, असं मी मानतो. त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता असं राज ठाकरे म्हणाले होते. याच राज ठाकरेंच्या टीकेबाबत नरहरी झिरवाळ ( Narhari Zirwal ) यांना विचारलं असता त्यांनी यावर खास शैलीत उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray : राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल, “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतक्या खालच्या…”

नरहरी झिरवाळ यांचं राज ठाकरेंना उत्तर

“राजकारणाची सर्कस झाली असेल तर मी सर्कस करो किंवा तमाशा करो, पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या काही १७ संवर्गांना आजपासूनच आदेश दिला आहे, कुणाला नाटक दिसो, सर्कस दिसो काहीही दिसो. ज्या रखडलेल्या गोष्टीही पुढे जात आहेत. का आल्या नव्हत्या इतक्या दिवसांत? मी आंदोलन राजकारणासाठी केलं असेन किंवा कुठला हेतू ठेवून केलं असेल. पण मुलांचं हित तर होतं आहे. मी जाळी नसलेल्या ठिकाणीही उडी मारु शकतो, मी आदिवासी आहे. आदिवासी कुठंही उडी मारु शकतो. जाळी होती हे खरं आहे. ज्यांना कुणाला प्रयोग करायचा असेल तर डबल जाळी लावून फक्त उडी मारुन दाखवा तेवढ्या उंचीवरुन. राज ठाकरेंना आव्हान देतो असं नाही, जे कुणीही बोलतात त्यांना आव्हान देतो. समाजाचं भलं होणार असेल तर मीच नाही अनेक लोक उड्या मारतील.” असं उत्तर झिरवाळ ( Narhari Zirwal ) यांनी दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनगर आरक्षणावर काय म्हणाले झिरवाळ?

राज्य सरकारने धनगड नावाने काढण्यात आलेले जातीचे दाखले रद्द केले आहेत. धनगर समाजाकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे. सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं नरहरी झिरवळ ( Narhari Zirwal ) यांनी म्हटलंय. त्यामुळे, राष्ट्रवादी सत्तेत असलेल्या महायुती सरकारला नरहरी झिरवाळ यांचा घरचा आहेर आहे. तसेच, आमच्यातील बोगस दाखले देखील रद्द करा, आमची मागणी होती. तेव्हा मात्र सरकारने हे आमच्या अधिकारात नसल्याचं सांगत हात झटकले. मग आता सरकारने हा निर्णय कसा घेतला?, असा सवाल केला आहे. तर, याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि जाब विचारणार असल्याचंही झिरवाळ ( Narhari Zirwal ) यांनी म्हटलं आहे.