सांगली जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना जोरदार धक्का देत तरुणांच्या हाती सत्ता देण्यात आली. गेल्या चार दशकांपासून हाती सत्ता असूनही खुर्चीचा खेळ आता परवडणारा नाही, असाच संदेश कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाने दिला. यानिमित्ताने माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा राजकीय मंचावर झालेला दणदणीत प्रवेश आणि कडेगावमध्ये राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना बसलेला पराभवाचा धक्का प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाने १० जागा जिंकल्या आहेत. कदम यांच्या पॅनेलला सहा जागा जिंकता आल्या. स्व. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास राज्यमंत्री कदम कमी पडत आहेत अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. या ठिकाणी त्यांचे पारंपरिक विरोधक म्हणून देशमुख गटाने १० जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली आहे. दरम्यान विश्वजीत कदम यांच्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आर. आर. आबांच्या मुलाचा राजकीय मंचावर प्रवेश; विश्वजित कदम यांना धक्का; सांगलीत संमिश्र निकाल सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाचा पराभव करणं शक्य होतं. आकडेवारी तेच दाखवत आहे. अशी त्रुटी राहणार नाही पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना काळजी घेईल". दरम्यान जयंत पाटील यांनी पक्षात लवकरच आणखी काही प्रवेश होणार असल्याचं सांगितलं आहे. ते तर होणारच आहे. पक्षात प्रवेश होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसेल असं सांगताना ते म्हणाले की. "राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. प्रत्येक गुरुवारी मुंबईl मोठ्या संख्येने नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, सांगलीत पण काही दिवसात इनकमिंग झालेले दिसेल".