मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट हे शिवसेनेचे दोन गट पक्षनाव आणि चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. यासंदर्भात लेखी भूमिका मांडण्याचे निर्देश देऊन आयोगाने ३० जानेवारी रोजी पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी कमालीची उत्सुकता सगळ्यांना लागली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे नवी चर्चा राज्यच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजकीय उलथापालथीचे संकेत? सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झालं. त्यानंतरही राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा आरोप-प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या उत्सुकतेमध्ये अजून भर घालणारं ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे. शरद पवारांसमोरच एकनाथ शिंदेंचा दावोस करारांवरून विरोधकांना टोला; म्हणाले, “कुणी काहीही…!” काय आहे ट्वीटमध्ये? अमोल मिटकरींनी केलेल्या ट्वीटमध्ये राज्यात राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. "सरकारचं कऊंटडाऊन सुरू. शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की", असं सूचक ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे. हे ट्वीट आता चर्चेत आलं असून त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शिंदे गटाचे आमदार जर न्यायालयात अपात्र ठरले, तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, अशी शक्यता विरोधी पक्षांकडून सातत्याने वर्तवली जात आहे. त्यात विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सरकार कोसळण्याचे दावेही केले जात आहेत. निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार? यावर पुढील सगळी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.