उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कंत्राटी नोकर भरतीचा जीआर मागे घेतला आहे. यावेळी त्यांनी कंत्राटी नोकर भरती करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारने केल्याचा आरोप केला. फडणवीसांच्या या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, कंत्राटी नोकर भरतीच्या प्रश्नावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांवर यांच्यात जुंपली आहे.

रोहित पवार हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत, त्यांना अजून आमदारकीच्या मिशाही फुटल्या नाहीत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. राणेंच्या या टीकेला रोहित पवारांनी उपरोधिक प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे हे माझे चांगले मित्र आहेत. ते कठोर परिश्रम करून राज्यातील राजकारण इतक्या खालच्या पातळीवर घेऊन जात आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मंत्रीपद मिळावं, अशी मी प्रार्थना करतो, असा टोला रोहित पवारांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही”, मराठा आरक्षणाबाबत रामदास कदमांची थेट भूमिका

रोहित पवारांना अजून आमदारकीच्या मिशाही फुटल्या नाहीत, या नितेश राणेंच्या टीकेबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “आता ते क्रिकेट बघतात की नाही? हे आपल्याला माहीत नाही. पण काल रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल तिघेही चांगलं खेळले. शुबमन गिलने ५० धावा केल्या. तो नवीन खेळाडू आहे, त्याची खेळण्याची स्टाईल नवीन आहे आणि त्याने ५० धावा केल्या. रोहित शर्मा अनेक वर्षांपासून खेळतोय, त्यानेही ४८ धावा केल्या. पण नितेश राणेंचा तर्क सगळीकडे लावला तर आपल्याला सगळीकडे वयस्कर लोकच दिसतील.”

हेही वाचा- कंत्राटी नोकरभरतीवरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल; थेट मंत्र्यांची यादीच केली जाहीर, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नितेश राणे आज जे बोलत आहेत, ते काँग्रेसमध्ये असताना काय बोलायचे? याचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ केला पाहिजे. कपडे बदलावे तसे ते भूमिका आणि पार्टी बदलत असतील, तर त्यांच्या भूमिकेवर आणि मतावर आपण किती बोलावं आणि किती वेळ घालवावा, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना जे काम दिलं आहे, ते काम ते चांगलं करतात. त्यांना माझ्या शुभेच्छा. ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मी प्रार्थना करतो की, त्यांना लवकरात लवकर मंत्रीपद मिळावं. कारण ते एवढं परिश्रम करत त्यांचे विचार आणि राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर घेऊन जात आहेत. तरीसुद्धा त्यांना मंत्रीपद मिळत नसेल तर अतिशय वाईट गोष्ट आहे. तुम्ही पदासाठी लढत राहा, आम्ही युवकांच्या हितासाठी लढत राहू,” असंही रोहित पवार म्हणाले.