उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात द्रौपदीचा उल्लेख केला आणि तातडीने मी गंमतीने ते म्हटलं असं म्हणत हातही जोडले. मात्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा होते आहे. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता असं अजित पवार यांनी तातडीने सांगितलं मात्र त्यांच्या याच वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“आम्ही मधल्या काळात पाहिलं की मुला-मुलींच्या जन्मदरात काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड तफावत पाहण्यास मिळाली. एक हजार मुलांच्या मागे ८०० ते ८५० मुली जन्माला येत होत्या. हा दर ७९० पर्यंतही गेला होता. पुढे तर अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय? असा प्रसंग त्यावेळेस येईल.” असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर लगेचच अजित पवार म्हणाले, “यातला गंमतीचा भाग सोडून द्या, नाहीतर म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. मला कुणाचाही अपमान करायचा नाही. ” असं स्पष्ट करत अजित पवारांनी थेट हातच जोडले. मात्र अजित पवारांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. आता यावर जितेंद्र आव्हाडांनी जोरदार टीका केली आहे.

हे पण वाचा- महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“अजित पवारांच्या डोक्यात जे विष होतं ते बाहेर आलं आहे. ज्या काकांनी स्त्रियांना ५० टक्के आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला, महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला होता. महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना न्याय दिला त्यांच्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असत्या असं म्हणतात. द्रौपदीचा अर्थ काय होतो? त्यांनी जरा समजवून सांगावं आणि समस्त महिला वर्गाची माफी मागावी” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.