मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे आजच्या दिनाला गद्दार दिवस म्हणून घोषित करा अशी मागणी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला केली आहे. संजय राऊतांच्या या मागणीला प्रत्युत्तर म्हणून भाजपा नेते नितेश राणे यांनीही संयुक्त राष्ट्र संघटनेला विनंती केली आहे.

“२७ जुलैला देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा. आतापर्यंतचा सर्वात मोठा देशद्रोही यादिवशी जन्माला आला होता”, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

ते ट्वीटमध्ये म्हणतात की, “महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्ती असलेल्या आपल्याच वडिलांच्या पाठीत त्याने खंजीर खुपसला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याच्या आपल्या घाणेरड्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी स्वतःच्या धर्माच्या आणि भाजपासारख्या जवळच्या मित्राच्या पाठीत वार केले. त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भ्रष्टाचार करून करोडो पैसे कमवले. म्हणून मी २७ जुलै हा दिवस देशद्रोही दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन करत आहे. कारण आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा देशद्रोही या दिवशी जन्माला आला होता. म्हणून जग त्याला आठवते आणि दररोज त्याला शाप देते.”

संजय राऊतांनी युनेस्कोला लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं होतं?

२० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी ५० खोके (५० कोटी) रुपये घेतले त्यामुळे २० जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा >> ‘२० जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करा’, संजय राऊत यांचं संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातही उल्लेख

उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी जे भाषण केलं त्या भाषणातही त्यांनी २० जून हा जागतिक गद्दार दिन आहे असं वक्तव्य केलं आहे. तर १८ जून रोजी जो शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात आदित्य ठाकरेंनीही हेच वक्तव्य केलं होतं. २० जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. आता संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे.