नागपूर येथील धापेवाडा या ठिकाणी असलेल्या भक्ती फार्म या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी एका अनोख्या मल्चिंग पेपर तंत्राचा वापर करुन एक किलो वजनाच्या कांद्याची शेती केली आहे. एक कांदा एक किलोपर्यंत वजनाचा असल्याचा प्रयोग या शेतात राबवण्यात आल्याने सेंद्रीय शेतीला प्रेरणा देणाराच हा प्रयोग ठरला आहे.

नितीन गडकरींनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गडकरींनी सांगितलं की या प्रक्रियेची सुरुवात नेदरलँडमधून आलेल्या कांद्याच्या विशेष बियाणांपासून करण्यात आली. सेमिनिस क्लॉज कंपनीचं हे कांदा बियाणं होतं. कांचन गडकरींनी कांद्यांचं अडीच किलो बियाणं एक एकर शेतामध्ये रुजवलं. सुरुवातीचे ४५ दिवस नर्सरी तयार करण्यात आली आणि कांद्याचं पीक सुरक्षित राहिल याची सगळी खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर ट्रांसप्लांटेशन प्रकिया करण्यात आली. डबल ड्रीप सिंचनाचा वापरही त्यात करण्यात आला.

कांदा उत्पादनासाठी मल्चिंग पेपर तंत्राचा उपयोग कसा करण्यात आला?

याच बरोबर मल्चिंग पेपर तंत्राचा उपयोग करण्यात आला. मल्चिंग पेपर ही २५ मायक्रॉनची एक प्लास्टिक फिल्म आहे. जमिनीवर ती पसरवण्यात येते आणि त्यात मोठी छिद्रं केली जातात. त्या ठिकाणी रोपं रोवली जातात. या खास तंत्रामुळे शेती करताना फायदा होतो. मातीची आद्रर्ता तशीच ठेवण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडतं. तसंच या पेपर तंत्रात तण उगवत नाही. तापमानही मर्यादित प्रमाणात राहतं. या तंत्राने २४ हजार कांदा रोपं लावण्यात आली. या प्रयोगामुळे प्रति एकर १२ ते १३ टन कांदा उत्पादन करण्यात आलं. हे सगळे कांदे सेंद्रीय आहेत. एका कांद्याचं वजन हे सरासरी ४०० ग्रॅम ते ८०० ग्रॅम पर्यंत आहे. साधारण ७ ते १० टक्के रोपं वाया गेली. मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांचन गडकरींनी काय म्हटलं आहे?

कांद्याच्या या उत्पादनाबाबत कांचन गडकरी म्हणाल्या, “आमचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तंत्राशी जोडणं हा आहे. शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढली पाहिजे आणि त्यांच्या पिकांना, उत्पादनांना योग्य दर मिळाले पाहिजेत. कुठल्याही शेतकऱ्याला सेंद्रीय पद्धतीने कांदा उत्पादन पद्धती अवलंबायाची असेल तर आम्ही त्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत.” शेतीतल्या या अनोख्या प्रयोगामुळे सेंद्रीय शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं आहे. तसंच हा प्रयोग शेतीतला एक मैलाचा दगड ठरु शकतो यात शंका नाही.