सांगली : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत एक हजारहून अधिक प्रकल्प मंजूर असून ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन २०२५-२६ हे योजनेचे अंतिम वर्ष असून, या योजनेंतर्गत जिल्ह्यात अजून एक हजार प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे ही योजना सहा वर्षांसाठी लागू केली आहे. अंतिम वर्षात या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात एक हजार प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे जवळपास २० कोटी निधी अनुदानापोटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकूण पाच हजार कुशल व अकुशल मनुष्यबळाची रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, या योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये आजअखेर जिल्ह्यात १३२० प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना २८.१८ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेद्वारे सुमारे ५०५५ कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाला आहे. ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेंतर्गत जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया – ३१७, तृणधान्य प्रक्रिया – १७७, कडधान्य प्रक्रिया – १५४, मसाला उद्योग – २३३, दुग्ध प्रक्रिया उद्योग – ७७, फळ व भाजीपाला प्रक्रिया – ४५, बेकरी पदार्थ – १३३, गूळ प्रक्रिया – २०, खाद्यतेल प्रक्रिया – ४८, पशुखाद्य निर्मिती – ४१ व इतर – ७५ इत्यादी उद्योगांचा समावेश आहे.