परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत त्यावेळी देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, असं सांगितलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत सवाल पवारांना सवाल केला आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले. त्या पत्रावरून बरंच रणकंदन सुरू असून, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाला ठोस आधार नसल्याचं सांगत पवारांनी देशमुखांची पाठराखण केली. परमबीर सिंग यांनी दिलेल्या तारखांच्या कालावधीत देशमुख हे क्वारंटाईन होते, असं म्हणाले.

पवार यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शरद पवारांना उलट सवाल केला आहे. “१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- प्रकाश आंबेडकर

“परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा लोकसभेत गंभीर आरोप

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेले आरोप. त्यावर शरद पवारांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि आता भाजपाने देशमुख यांच्या १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेवरून पुन्हा सवाल उपस्थित केल्यानं राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका मांडते, हे महत्त्वाचं ठरणार आहे.