अशोक तुपे

बर्ड फ्लूचा सामना करण्यात कुक्कुटपालन उद्योगाला यश आले आहे. उद्योग पूर्वपदावर आला असून कोंबडय़ांची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे. दरातही सुधारणा झाली आहे. मात्र, समाजमाध्यमांवरील अफवांमुळे दुसऱ्यांदा राज्यातील कुक्कुटपालन उद्योगाला सुमारे ६०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

समाजमाध्यम व माध्यमांमध्ये बर्ड फ्लूच्या बातम्या सातत्याने झळकल्या. तसेच कुठलाही शास्त्रीय आधार नसतानाही कोंबडय़ा खाण्याबाबत चुकीचे संदेश व बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून कुक्कुटपालन उद्योगाला संकटाचा सामना करावा लागला. एका बाजूला पोल्ट्रीतील पिले आणि कोंबडय़ांना बर्ड फ्लू होणार नाही याची काळजी पोल्ट्रीचालकांना घ्यावी लागली. त्यावर खर्च वाढला. मात्र, बाजारात मागणी घटल्याने कोंबडय़ांच्या खाद्यावर खर्च करावा लागला. कोंबडीचा किलोचा दर हा ९० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. बाजारातील मागणी एकदम कमी झाली होती; पण सरकारच्या अनेक संस्थांनी जागृती केल्यामुळे ग्राहकांमधील गैरसमज दूर झाला आहे. हॉटेल व घरगुती ग्राहकांची चिकनला मागणी वाढली आहे. लोक कुठलीही भीती न बाळगता चिकन खाऊ लागले आहेत. त्यामुळे आता बाजारात कोंबडीचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. पोल्ट्रीचालकांना ८० रुपये दर मिळत आहे. खुल्या बाजारात पिसेविरहित चिकनचा दर १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एकूणच हा उद्योग स्थिरस्थावर झाला आहे. मात्र, दीड महिन्याच्या काळात सुमारे ६०० कोटी रुपयांचे नुकसान पोल्ट्री उद्योगाला सोसावे लागले आहे.

चिकन खाल्लय़ामुळे करोना विषाणूचा संसर्ग होतो, अशा समाजमाध्यमांवरील खोटय़ा संदेशामुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला होता. राज्यात आठ हजारांहून अधिक पोल्ट्री फार्म आहेत. दररोज दीड हजार टन चिकनची विक्री होते; पण त्या काळात कोंबडय़ांची मागणी घटली होती. मात्र, गैरसमज दूर झाल्यानंतर पुन्हा मागणी वाढली होती. अफवा पसरविण्याच्या प्रकाराबद्दल पोल्ट्रीचालकांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली होती. मात्र, अद्याप या प्रकरणी चौकशी होऊन गुन्हेगारांना अटक झालेली नाही. आता दुसऱ्यांदा बर्ड फ्लूच्या साथीनंतर माध्यमांत चुकीच्या बातम्या आणि समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश गेल्याने या उद्योगाला मोठा फटका बसला. करोनाकाळात राज्यातील पोल्ट्री उद्योगाचे अडीच हजार कोटींचे नुकसान झाले होते.

राज्यात बंदिस्त पोल्ट्री फार्म आहेत. राज्यभरातील पोल्ट्री शेडमध्ये चार ते साडेचार कोटी पक्षी असतात. बर्ड फ्लूची साथ आल्यानंतर सुमारे दीड महिना खपावर परिणाम झाला होता. त्यामुळे कोंबडय़ांच्या खाद्यावर खर्च करावा लागला. दररोज सात हजार टन खाद्य लागते. त्यावर मोठा खर्च झाला; पण आता हा उद्योग पूर्वपदावर आला आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने यासंबंधी जागृती केली. बंदिस्त पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत नाही. बर्ड फ्लूचा संसर्गमुक्त कुक्कुटपालन विशेषत: गावरान कोंबडय़ा जेथे असतात तेथे होतो.

राज्यात दीड महिन्यापूर्वी परभणी येथे बर्ड फ्लूचे आगमन झाले. त्यानंतर अनेक जिल्ह्य़ांत तो पसरला; पण एकाही बंदिस्त पोल्ट्री फार्ममध्ये त्याचा प्रादुर्भाव झाला नाही. पोल्ट्री फार्ममध्ये लसीकरण केले जाते. बाहेरील पक्ष्यांशी त्यांचा संबंध येत नाही. त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये कोंबडय़ा या सुरक्षित असतात. त्यामुळे दीड महिन्यात एकाही बंदिस्त पोल्ट्री फार्मला बर्ड फ्लूची बाधा झाली नाही.

बंदिस्त पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू येत नाही. मात्र, काही वाहिन्यांवर चुकीच्या बातम्या आल्या. त्यामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योगाला सहाशे कोटींचा फटका बसला आहे. आता उद्योग सावरत आहे. कोंबडय़ांचे दर वाढले असून ग्राहकांची मागणी वाढत आहे. करोनापूर्वी चिकनला जे दर होते, ते दर मिळू लागले आहेत. करोनानंतर दुसऱ्या संकटाचा मुकाबला पोल्ट्री उद्योगाने केला आहे.

– डॉ. दत्तात्रय कदम, संचालक, यशदा फुडस् आणि के.वाय. अ‍ॅग्रोव्हेट

बर्ड फ्लू आल्यानंतर ग्राहकांचा गैरसमज निर्माण झाला होता; पण अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने तसेच केंद्र व राज्य सरकारने मोठी जागृती केली. त्यामुळे ग्राहकांनी चुकीच्या बातम्यांकडे पाठ फिरविली. आता चिकन व अंडी सुरक्षित आहेत. याबद्दल ग्राहकांची खात्री पटली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व धाब्यांवर कोंबडय़ांची मागणी वाढत आहे. दीड महिन्यात पोल्ट्री उद्योग पूर्वपदावर आला.

– दीपक चव्हाण, पोल्ट्री उद्योगाचे अभ्यासक व सल्लागार

करोनाकाळात पोल्ट्री उद्योगाची अवस्था वाईट झाली होती. त्यातून सावरत असतानाच बर्ड फ्लूचे संकट आले. अफवांमुळे ग्राहकांचा गैरसमज केला गेला. दुसऱ्यांदा हे घडले. तरीदेखील आता ग्राहकांचा गैरसमज दूर झाला आहे. पोल्ट्री उद्योगाने दोन्ही संकटांवर मात केली; पण तरीदेखील उद्योगाला झळ बसली. राज्यात चिकनविक्रीची दीड लाखांहून अधिक दुकाने आहेत. ही सर्व दुकाने पूर्ववत सुरू झाली आहेत. पोल्ट्री उद्योग सावरू लागला आहे. मागणी वाढल्याने दराही सुधारणा होत आहे.

– डॉ. केदार काळे, महाव्यवस्थापक, व्यंकटेश हॅचरिज (वेंकीज् चिकन)