‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली, असे संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी शनिवारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रथमच मान्य केले, मात्र त्यांनी त्याचे तपशील दिले नाहीत. किती विमानांचे नुकसान झाले त्यापेक्षा ते का झाले हे शोधून काढणे अधिक महत्त्वाचे होते, असे ते म्हणाले. त्याचवेळी भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा संपूर्ण चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता टीकेची झोड उठत आहे. सरकारने दिशाभूल केल्याचा दावा काँग्रेसने केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी एक्सवरून पोस्ट करत टीका केली.
“हे एक क्षुल्लक प्रकरण नाहीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची दिशाभूल केलीय का? संरक्षण दलप्रमुखांनी सिंगापूरला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आपलं नेमकं काय नुकसान झालंय, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तपशीलवार माहिती देतील का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशाला देणं गरजेचं आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसकडूनही केंद्र सरकारवर टीका
“सिंगापूरमध्ये एका मुलाखतीत संरक्षण प्रमुखांनी (सीडीएस) केलेल्या वक्तव्यानंतर, काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावले तरच हे प्रश्न विचारता येतील. मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली आहे. युद्धाचे धुके आता दूर होत आहे”, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
आमचे भारतीय हवाई दलाचे वैमानिक शत्रूशी लढताना आपले प्राण धोक्यात घालत होते. आमचे काही नुकसान झाले आहे, परंतु आमचे वैमानिक सुरक्षित होते. आम्ही त्यांच्या दृढ धैर्याला आणि शौर्याला सलाम करतो.परंतु, व्यापक धोरणात्मक आढावा ही काळाची गरज आहे. कारगिल पुनरावलोकन समितीच्या धर्तीवर, स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून आमच्या संरक्षण तयारीचा व्यापक आढावा घेण्याची काँग्रेस पक्षाची मागणी आहे.