येथील जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा घालणाऱ्या आठ आरोपींना न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून आठ जणांपैकी तिघांना १२ वष्रे, दोन महिला आरोपींना चार वष्रे तर उर्वरित तिघांना १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) दाखल असलेल्या या खटल्यात विशेष न्यायाधीश स.शि.दास यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली. जन्या उर्फ जनार्दन वाघमारे (२७, भांडेगाव, हिंगोली), रफिक शेख नबी शेख उर्फ शेखर पाटील (३८, हवेरी, कर्नाटक), तान्या उर्फ तानाजी भोसले (३५, रा. बोरखेडी हिंगोली) यांच्या विरूद्ध आरोप सिद्ध झाल्याने त्यांना १२ वष्रे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनिल मोहनकर (२८, आर्वी, वर्धा), काल्या उर्फ दिलीप वाघ (३१, मोर्शी), उम्या उर्फ ओमप्रकाश भटकर (२८, अकोला) यांना १० वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे, तर नसरीन बानो रफीक शेख (३२, हवेरी, कर्नाटक) आणि अंजली वाघमारे (२५, भांडेगाव, हिंगोली) या दोघींना चोरीचा माल दडवल्याची शिक्षा म्हणून चार वष्रे तुरूंगावास भोगावा लागणार आहे. खंडेलवाल ज्वेलर्स या सराफा दुकानावर ३१ ऑगस्ट २०१० रोजी सशस्त्र दरोडा घालण्यात आला होता. दुकानमालकाला मारहाण करून बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी ३२ लाख ९९ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांनी बारकाईने या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक केली होती. तपासात पोलिसांनी आधुनिक साधनांचा उपयोग केला. आरोपींच्या विरोधात मकोका लावण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात १७०० पानांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. दरोडा घालण्याआधी तीन आरोपी दागिने खरेदीसाठी आल्याचे भासवत दुकानात शिरले होते. दुकानात फारसे ग्राहक नसल्याचे पाहून एकाने बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराच्या मोबाईलवर दहा सेकंदात दोन कॉल केले. संकेत देण्यासाठी आरोपींनी मोबाईल वापरला पण, त्यातूनच पोलिसांना तपासाचा धागा मिळाला.
या प्रकरणात दुकानाचे संचालक दीपक खंडेलवाल यांच्यासह दुकानातील कर्मचाऱ्यांचे बयाण महत्वाचे ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2014 रोजी प्रकाशित
दरोडय़ाप्रकरणी आठ आरोपींना सक्तमजुरी
येथील जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा घालणाऱ्या आठ आरोपींना न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून आठ जणांपैकी तिघांना १२ वष्रे, दोन महिला आरोपींना चार वष्रे तर उर्वरित तिघांना १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
First published on: 07-08-2014 at 07:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisonment to 8 accused for robbery in amravati