लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी संपल्याने या शेवटच्या दिवशी अवघी सांगलीनगरी राजकीय हालचालींचा केंद्र बनली. काँग्रेसने निवडणूक प्रचाराची सांगता राष्ट्रवादीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या सभेने तर भारतीय जनता पक्षाने वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत प्रचाराची सांगता केली. गेले १५ दिवस सुरू असणारे निवडणुकीचे घमासान सायंकाळी सहा वाजता शांत झाले. १७ उमेदवारांच्या सहभागामुळे बहुरंगी असणारी सांगलीतील लढत अंतिम टप्प्यात काँग्रेस व भाजप यांच्यातच चुरशीने रंगतदार बनली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या प्रतीक पाटील यांनी सायंकाळी सांगलीच्या किसान चौकात पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती जाहीर सभेत केली. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही धर्मनिरपेक्ष शक्ती प्रबळ करण्यासाठी काँग्रेसप्रणीत आघाडीच पर्याय ठरू शकते असे सांगत सर्वागीण विकासासाठी स्थिर शासनाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सांगली महापालिकेचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
प्रचारसभेनंतर पत्रकारांशी बोलताना प्रतीक पाटील यांनी आपण विजयी होणार असल्याचा दावा करीत सांगितले की, मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांपुढे आपण मांडला आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू या पाणी योजनांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे, दुष्काळग्रस्तांसाठी कोल इंडियाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले साहाय्य आदींसह अनेक कामे आपण मार्गस्थ केली. याबाबत लोकांपर्यंत पोहचविण्यास आपण उणे पडलो असलो तरी प्रचारादरम्यान मतदारांनीही भरघोस पािठबा दिला आहे. त्यामुळे लोक चांगल्या कामाला सहकार्य करतील हा विश्वास अधोरेखीत झाला आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी लोकांमध्ये निष्क्रिय खासदाराबाबत असणारी प्रचंड नाराजीच आपणाला विजयाप्रत नेऊ शकेल असे सांगितले. याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाच्या लढाईत युवा वर्ग सक्रिय झाल्याने ५०  हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आज त्यांनी वसंतदादा मार्केट यार्डात पदयात्रा काढून व्यापारी व हमाल माथाडी कामगारांशी संपर्क साधला. तसेच सांगली शहरात ठिकठिकाणी जावून वैयक्तिक गाठीभेटी घेत सहकार्याचे  आवाहन  केले.
प्रशासन सज्ज
१६ व्या लोकसभेसाठी गुरुवारी सांगली मतदारसंघात मतदान होत असून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. १६ लाख ३७  हजाराहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले असून मतदाराला मतचिठ्ठी घरपोच केली असून मतदाराला कमीत कमी त्रासात मतदान करण्याची सुविधा केंद्रावर उपलब्ध करून दिली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.
सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधान सभा मतदारसंघांचा समावेश असून मंगळवारी मतदान कर्मचारी संबंधित तहसील विभागात विशेष एसटी बसने पोहोच करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र सांगून मतदान मशिन व अन्य साहित्य घेऊन केंद्रावर पोहोच करण्यात येणार आहेत.
१० कर्मचारी निलंबित
निवडणूक कामकाजात कसूर केल्याप्रकरणी दहाजणांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली. यामध्ये डी. एस. चव्हाण, श्रीमती रेशमा लेंगरे, हणंमत चव्हाण, कुंडन जमदाडे, अभिजित खराडे, आर. एम. कोळी, जे. के. कर्नाळे, पी. जी. सूर्यवंशी आदींचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावून खुलासा मागितला होता. त्यांचा खुलासा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. मात्र आयोगाने हे खुलासे अमान्य करीत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.