Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज ९९ वर्ष पूर्ण झाले असून या संघटनेने १००व्या वर्षात पदार्पण केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आजपासून सुरु होत आहे. त्यानिमित्त विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन आहे. ९९ वर्ष पूर्ण करत या संघटनेने शंभरीत पदार्पण केलं आहे. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन करतो. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Ratan Tata : राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या नाशिकच्या प्रोजेक्टची रतन टाटांना पडली होती भुरळ, म्हणाले होते…

“संघाचं काम मला कायमच अचंबित करतं”

पुढे बोलताना, “संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे”, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना उत्तर, “मी आदिवासी आहे जाळी नसली तरीही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही”

“एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल, असं वाटत नाही. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असेही ते म्हणाले.