शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले जात आहे. या दिवशी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथे असणार्या स्मृतीस्थळावर दाखल होत असतात. यंदाही याठिकाणी राज्यातल्या विविध भागातून शिवसैनिक दाखल होत आहेत. शिवसैनिकांबरोबरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले आहेत?
राज ठाकरेंनी त्यांटा बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा एका जुना फोटो पोस्ट केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, “शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.”
बाळासाहेबांची प्रतिमा चोरून…
राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये बाळासाहेबांची प्रतिमा चोरणाऱ्यांवर टीका केली आहे. हिदुत्वाच्या नावे मते मागणाऱ्यांची आपल्याला गंमत वाटते असे राज ठाकरे म्हणाले आहे. “पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, (अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही!” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
पोस्टच्या अखेरीस मनसे तर्फे बाळासाहेबांना अभिवादन करताना सत्तेचा गैरफायदा घेणाऱ्या पक्षांना राज ठाकरेंनी टोला लगावला आहे. “फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन!” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
