“ग्रीक नाटकांमध्ये संपूर्ण नाटकाचं कथासूत्र तोलून धरणाऱ्या सूत्रधाराला ‘सिंगल पर्सन कोरस’ म्हणून ओळखलं जातं; स्वत:ला सतत नव्याने घडवण्याची क्षमता आणि जुन्या बाद संकल्पना मोडीत काढून नव्या कल्पना स्वीकारण्याची हिंमत असलेले राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘सिंगल पर्सन कोरस’ आहेत”, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी नुकतेच मुंबईत काढले. सोशल मीडियाचा सजग वापर करणारे पत्रकार कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या ‘दगलबाज राज’ या पुस्तकाचे प्रकाशन कांदिवली येथील तेरापंथ भवनात अंबरीश मिश्र यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक, ब्लॉग्ज आणि पोर्टल्स या ऑनलाइन माध्यमांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन करण्यात आले आहे. विविध प्रश्नांवर राज यांनी घेतलेल्या भूमिका, मनसेने केलेली आंदोलने यांच्यामागची सैद्धांतिक बाजू मांडणारे हे लेख आहेत. ‘दगलबाज राज’ हे या पुस्तकाचे शीर्षक मराठीचे सखोल आकलन नसलेल्याला चमकवून टाकणारे आहे. त्यामुळे, मिश्र यांनी राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ या शीर्षकाच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन “शिवाजी महाराजांना कपटाने मारायला आलेला अफझलखान कसा ‘दगाबाज’ होता आणि त्याचं कपट ओळखून त्याचा डाव त्याच्यावर उलटवणारे शिवाजी महाराज कसे ‘दगलबाज’ म्हणजे मुत्सद्दी-चाणाक्ष होते,” यातला फरक समजावून सांगितला. राज ठाकरे यांचे अनेक निर्णय परस्परविरोधी वाटले तरी त्यामागे त्यांची काही ठोस विचारसरणी आहे, हे महत्त्वाचे आहे, असे सांगून मिश्र म्हणाले की आज मनसेची स्थिती डळमळीत दिसत असली, तर राजकारणात एकच स्थिती कायम राहात नसते, ही परिस्थितीही पालटून मनसेला ऊर्जितावस्था येईलच.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackrey has leadership qualities that abolishes old concepts
First published on: 19-06-2018 at 12:52 IST