राज्यसभेसाठीच्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा भाजपकडून बुधवारी करण्यात आली. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, शिंदे गटाकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उद्यापर्यंत सर्व उमेदवार अर्ज दाखल करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुका होणार असल्याने सर्वांचं लक्ष याकडे लागून राहिलं आहे. दरम्यान, ही राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. "राज्यसभा निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. कारण सर्वांकडे आप-आपला कोटा आहे. सर्वांकडे जिंकून येण्याचा कोटा असेल तर चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेण्याची गरज नाही", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. हेही वाचा >> मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे; पंकजा मुंडे यांचे नाव नाही दरम्यान, भाजपाकडून तीनच उमेदवार जाहीर करण्यात आले असून शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. परंतु, भाजपाने चौथा उमेदवार जाहीर केला तर निवडणूक चुरशीची ठरली असती. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "आम्ही चौथा उमेदवार देणार नाही. कारण, सर्वांकडे कोटा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. १६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसंच, २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. तर, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, २७ तारखेलाच मतमोजणी होईल. कोणत्या राज्यासाठी किती जागा? १३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ताजी अपडेट अशोक चव्हाणांनी कालच (१३ फेब्रुवारी) काँग्रेसमधून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा प्रवेश होताच, त्यांना राज्यसभेचं गिफ्ट मिळालं आहे. तर, काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या मिलिंद देवरा यांनाही शिंदे गटाने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून ३, शिंदे गटाकडून १ उमेदवार जाहीर केले असून भाजपा चौथा उमेदवार जाहीर करणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.