स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. “सरकारला उर्फी जावेदने किती कपडे घातले यावर बोलायला वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांना अंगात घालायला कपडे नाही त्यावर बोलण्यास वेळ नाही”, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली. ते रिसोड येथे स्वाभिमानी शेतकरी मोर्चा मध्ये बोलत होते.

रविकांत तुपकर म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात नंगानाच सुरू आहे. त्या उर्फीने किती कपडे घातले आणि किती नाही घातले यावर रोज चर्चा होतात. मात्र, आमच्या शेतकऱ्यांच्या अंगात घालायला कपडेच नाहीत. त्यावर मात्र सरकारमधील लोक बोलत नाहीत. यांना उर्फीवर चर्चा करायला वेळ आहे.”

“महाराष्ट्रात सध्या दिवसरात्र उर्फीचं संकट आलं आहे…”

“महाराष्ट्रात सध्या दिवसरात्र उर्फीचं संकट आलं आहे असं सरकार भासवत आहे. या सरकारला माझी विनंती आहे की, कापूस पिकवणाऱ्या गावगाड्यातील शेतकऱ्याला अंगावर घालायला कपडे नाही, त्यावर सरकार कधी बोलणार आहे?” असा प्रश्न रविकांत तुपकर यांनी सरकारला विचारला.

“…तर सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”

रविकांत तुपकर पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पिकविमा मिळाला नाही, तर सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आगडोंब उसळेल.”

हेही वाचा : Photos : “एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते आणि हा नंगानाच…”, उर्फीच्या पोस्टवर चित्रा वाघ आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पश्चिम विदर्भात आत्महत्या वाढल्या”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, ते मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. मात्र, ते मुख्यमंत्री झाल्यावर पश्चिम विदर्भात आत्महत्या वाढल्या आहेत,” असंही तुपकर यांनी नमूद केलं.