राहाता:प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर, या प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष २०१९ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. नव्याने पुन्हा काही चौकशी होणार असली तर, त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याची भूमिका जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कारखान्याच्या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याबाबत बोलताना विखे म्हणाले, सन २००४ मध्ये झालेले प्रकरण आमच्या विरोधकांनी सन २०१४ मध्ये उकरून काढले. याबाबत स्थानिक न्यायालयापासून ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावण्या झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होत नसल्याचे स्पष्ट करून, याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण केव्हाच संपले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राहाता न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यांचा कलम १५६ (३) प्रमाणे केलेला आदेश कायम ठेवल्याने हा गुन्हा दाखल झाला. कोणतीही चौकशी ही गुन्हा दाखल झाल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे पुन्हा याच प्रकरणात नव्याने होणाऱ्या चौकशीला सामोरे जाण्याची कारखाना व्यवस्थापनाची तयारी आहे. मार्च २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारणात दिलेल्या आदेशात कारखाना व्यवस्थापन व इतरांच्या विरोधात त्रास होईल अशी कोणतीही जबरदस्तीची कारवाई करू नये, असा स्पष्ट आदेश दिल्याने या प्रकरणातील सर्वच स्पष्टता आता समोर आल्याचे विखे म्हणाले.
महायुतीचे यश अनेकांना देखवत नाही
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने सलग आठ वेळा चांगल्या मताधिक्याने मला निवडून दिले. जनतेचा विश्वास कामातून मी सार्थ ठरवला. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेले मोठे यश अनेकांना देखवत नाही. व्यक्तिव्देषापोटी मला बदनाम करण्यासाठी विरोधक केविलवाणा प्रयत्न करतात. असे प्रयत्न यापूर्वीही अनेकवेळा झाले, परंतु जनतेने त्यांना थारा दिलेला नाही. आत्तासुध्दा कारखान्याच्या माध्यमातून बदनामी करण्याचाच प्रयत्न आहे. पण यात त्यांना यश मिळणार नसल्याचे विखे यांनी सांगितले.
विरोधकांचा बोलविता धनी कोण? निवडणूक आली की, वातावरण निर्माण करायचे आणि वैफल्यापोटी आरोप करायचे, ही आमच्या विरोधकांची सवय आहे. यामध्ये ते स्वतःची पत घालवून बसले आहेत. यासर्व प्रकरणात त्यांचा बोलविता धनी कोन आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. कारखान्याच्या बाबतीत एवढीच कळकळ त्यांना होती तर, निवडणुकीत सभासदांना सामोरे का गेले नाहीत. सद्य:स्थितीत त्यांनी उकरून काढलेल्या प्रकरणातील योजनेचे ते लाभार्थीही नाहीत. जनतेचा विश्वास त्यांनी केव्हाच गमावल्याची टीका विखे यांनी केली.