उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेतील शक्तिप्रदर्शन टळले असले तरी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणारे आमदार अद्याप राज्यात आलेले नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यानंतर गोव्यामध्ये रात्री उशिरा हे बंडखोर आमदार दाखल झाले असले तरी त्यांनी महाराष्ट्रात येण्याची घाई करु नये असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील बातमी दिलीय. हा सल्ला देण्यामागील मुख्य कारण म्हणजे भाजपाने अद्याप पुढील नियोजन केलेलं नसून बंडखोर आमदारांनी थेट शपथविधीच्या दिवशी मुंबईत यावं अशी भाजपाची इच्छा आहे.

नक्की वाचा >> “आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…”; उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेत्यानं केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

उद्धव ठाकरेंनी रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुमत चाचणीसाठी मुंबईतील ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये जमलेल्या भाजपा आमदारांनी जल्लोष केला. यावेळी चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. या जल्लोषानंतर हॉटेलबाहेर पडलेल्या चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्या (३० जून रोजी) मुंबईत येऊ नये असं आवाहन केलं आहे.

नक्की वाचा >> “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसं फोडणाऱ्या, त्यांच्याविरोधात द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल…”

“जे (शिवसेनेचे बंडखोर आमदार) उद्या मुंबईत येणार आहेत त्यांना मी आवाहन करतो की उद्या त्यांनी येऊ नये. त्यांनी शपथविधी असेल त्या दिवशी यावं,” असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. शपथविधी कधी होईल यासंदर्भातील काही निर्णय झालेला नसल्याने चंद्रकांत पाटलांनी असला सल्ला बंडखोर आमदारांना दिल्याचे समजते.

“शपथविधी कधी होईल, त्यावर निर्णय व्हायचा आहे. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, जर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. “सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे. हा दिवस अचानक आला आहे. नाहीतर उद्याचा पूर्ण दिवस टेन्शनमध्ये गेला असता. आता एक दिवस रिलॅक्स मिळाला आहे. बसून चर्चा करू आणि नंतर ठरवू,” असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> नामकरणाचा निर्णय : शिवसेना म्हणते, “मुस्लिमांनी अयोध्येप्रमाणे संभाजीनगरचा निर्णयही स्वीकारावा; सत्ता असताना फडणवीसांनी…”

दरम्यान, मध्यरात्रीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यामध्ये पोहचले असता राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे त्यांच्या स्वागतासाठी हजर असल्याचं दिसून आलं.

दुसरीकडे या शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांचा कायदेशीर मुद्दा कायम आहे. सत्ताबदल झाल्यावरही शिवसेना व शिंदे गटात कायदेशीर लढाई कायम राहणार आहे. विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले असते तर शिवसेना व शिंदे गटात कायदेशीर मुद्दा पुढे आला असता. कारण शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश काढला होता. शिंदे गटाने प्रभू हे प्रतोद नाहीत तर गोगावले हे प्रतोद असल्याचा दावा केला होता. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान टळले असल्याने कायदेशीर मुद्दा उद्या उद्भभणार नाही.

विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव किंवा नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी पुन्हा शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये पक्षादेशाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. नवीन अध्यक्षाची निवड करून शिंदे गटाच्या आमदारांच्या गटाला मान्यता देण्याची खेळी भाजपकडून केली जाईल. पण तोपर्यंत शिवसेना व शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरूच राहिल.