रत्नागिरी शासनाच्या सर्वच विभागांनी रिक्त पदांची भरती करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करुन अनुकंपा मधून भरती करण्याबाबत प्राधान्याने काम करावे, अशा सुचना संबधित विभागाच्या प्रमुखांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत.

नगरपालिका, नगरपंचायत यांनी लाड पागे समितीनुसार रिक्त पदांची भरती करावी तसेच सर्वच विभागांनी रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे, असे निर्देशच पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत सर्वच विभागांची विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. 

बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधिक्षक बाबूराव महामुनी आदी उपस्थित होते. १५० दिवस कार्यक्रमांतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी रिक्त पदांबाबत माहिती दिली.  यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत विविध विभागांच्या प्रमुखांकडून कार्यालयात असणाऱ्या रिक्त पदांबाबत सविस्तर आढावा घेतला.

शासनाच्या संबधित विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्याचे दिसून आले आहे. रिक्त जागामुळे एकाच कर्मचारी वर्गावर कामाचा अधिक भार पडत असल्याने  शासकीय योजना राबविण्यात व कामात सुसूत्रता येत नसल्याने ही रिक्त पदे भरण्याची आग्रही भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे