राज्यात करोनानं चिंता वाढवलेली असताना राष्टवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं नाव एका प्रकरणामुळे मंगळवारपासून चर्चेत आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ठाण्यातील एका व्यक्तीनं जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर हे प्रकरण राज्यात चर्चेत आलं आहे. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकानं मंत्र्यांच्या घरी नेऊन आणि मंत्र्यांच्याच उपस्थितीत बेदम मारहाम करणे अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावं. सामान्य माणसांवर अन्याय झाला, तर त्याविरुद्ध आवाज उठवण गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आलं पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्य अस्तित्वात राहणार नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा- जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; अभियंत्याला बेदम मारहाण माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही -आव्हाड एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावले आहेत. "माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का? अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.