Rohit Pawar Post On Ajit Pawar and IPS Anjana Krishna Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या महिला पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी फोनवरून फोनवरून झालेले संभाषण गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकार्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम अजित पवारांनी केले, असा आरोप विरोधकांनी केला होता. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देखील दिले होते. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.
या प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजित पवारांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाल्याचेही रोहित पवार म्हणाले आहेत. याबरोबरच अजित पवार यांची या प्रकरणी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात असल्याचे रोहित पवार म्हणाले आहे. याबरोबरच त्यांनी आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. यासंबंधी एक पोस्ट रोहित पवारंनी एक्सवर केली आहे.
रोहित पवारांची पोस्ट
“कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की! मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील!” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
पक्षांतर्गत कुरघोडी करण्यासाठी या प्रकरणाचा वापर होत असल्याचे रोहित पवारांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की, “राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्ताने आलाच असेल.”
अजित पवारांनी काय स्पष्टीकरण दिलं?
अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे.माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे अजित पवारम म्हणाले होते.
नेमकं प्रकरण काय आहे?
सोलापूरमधील मुरूमाच्या उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी अजित पवार म्हणाले की, ऐका, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई रोखा. मात्र कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन का नाही केला? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी तुमच्यावर कारवाई करू, असे संतापून म्हटले.
“तुम्हाला मला पाहायचे आहे का? तुमचा मोबाइल नंबर द्या, तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतो आणि माझा चेहरा दाखवतो. तुमची एवढी हिंमत झाली का?”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यानंतर अंजना कृष्णा यांना व्हिडीओ कॉल करून अजित पवार यांनी त्यांना कारवाई रोखण्याचे थेट आदेश दिले.