लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये एकीकडे महायुतीचे नेते तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. सभा, मेळावे आणि बैठकांचा धडाका सध्या सुरु आहे. यातच महायुतीमधील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथील मेळाव्यात बोलताना एक विधान केले आहे. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन अंगठे देण्यासही आपण तयार आहोत’, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

“मी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतो. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुटुंबप्रमुख म्हणून आमचा विश्वास आहे. महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी मला दोन अंगठे देण्याची वेळ आली तरी दोन अंगठे देण्यासाठी मी मागे-पुढे बघणार नाही”, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

हेही वाचा : माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदाभाऊ खोत यांनी महायुतीकडून कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघावर दावा केला होता. तसेच हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र, महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता सदाभाऊ खोत यांनी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले विधान चर्चेत आहे.