आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले असताना आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. करोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. तसेच, याप्रकरणात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान नवाब मलिक यांनी दिल आहे. दरम्यान मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहे. वर्षभरात नोकरी जाईल, या मलिकांच्या इशाऱ्यानंतर समीर वानखेडे म्हणाले, "माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. वारंवार १५ दिवसांपासून माझ्या मृत आईवर माझ्या निवृत्त वडिलांवर माझ्या बहिणीवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये घाण शब्दांचा वापर करण्यात येत आहे. तसेच माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यात येत आहे, या आरोपांचे मी पूर्णपणे खंडण करतो. नवाब मलिक खूप मोठे मंत्री आहेत. लोकांची बदनामी करण्याचा त्यांना अधिकार असेल. पण मी मी छोटासा सरकारी नोकर आहे. ते खूप मोठे मंत्री आहेत. ते जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रमाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्ज नष्ट करत असल्यामुळे ते मला जेलमध्ये टाकत असतील तर मी तयार आहे. मी दुबईला गेल्याची मलिकांची माहिती खोटी आहे." मालदीवमध्ये गेल्याच्या आरोपावर समीर वानखेडे म्हणाले, "मी कुटुंबासोबत मालदीवला गेलो होतो. यासाठी मी अधिकृत सुट्टी देखील घेतली होती. याचे पैसे देखील मी स्वत: दिले. तसेच मी बहिणीसोबत मालदीवला गेलो नव्हतो आमची ट्रीप वेगळी होती, याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. तसेच मलिकांनी ट्विट केलेले फोटो मुंबईतील आहेत. मालदिवमध्ये मी कोणत्याही अभिनेत्यांना भेटलो नाही. याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मी याबाबत कायदेशिर कारवाई करणार आहे." बॉलिवूडला टार्गेट करण्यासाठी एनसीबीत आणण्यात आल्याच्या आरोपावर वानखेडे म्हणाले. "हे सर्व खोटं आहे. मी एनसीबीत येण्यासाठी २०१९ मध्ये अल्पाय केला होता. तेव्हा ही केस माझ्याकडे नव्हती. त्यामुळे हे आरोप मी फेटाळतो. आम्ही करत असलेल्या कामाला पर्सनली घेत, माझ्या घरच्यांवर आरोप केल्या जात आहेत. माझी मृत आई, ७७ वर्षाचे वडील यांच्यावर आरोप करणे आपली राष्ट्रीय सेवा आहे का?", असा सवाल वानखेडे यांनी नवाब मलिकांना केला आहे. काय म्हणाले होते नवाब मलिक? “मालदीवमध्ये सर्व वसुली झाली!” नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे यांच्यावर नव्याने काही आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये सर्व वसुली मालदीवमध्ये झाल्याचं ते म्हणाले आहेत. “कोविड काळात सगळी इंडस्ट्री मालदीवमध्ये होती. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्या काळात मालदीवमध्ये होते. ते दुबई आणि मालदीवमध्ये काय करत होते? आम्ही मागणी करतो की त्यांनी सांगावं ते दुबईला गेले होते का? सगळी वसुली मालदीव आणि दुबईत झाली, ज्याचे फोटो आम्ही तुम्हाला देऊ”, असं नवाब मलिक म्हणाले. “सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर लगेच वानखेडेंची एनसीबीत बदली” “सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची केंद्र सरकारने एनसीबीमध्ये बदली केली. त्याचा तपास सीबीआयला दिला गेला. एसीबीचा खेळ सुरू झाला. लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. काही लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून बऱ्याच अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.