संगमनेर : शहरातील स्वामी समर्थनगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेसाठी खुला करण्यात आला. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला.
सुमारे चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळला होता. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय झाली होती. या पुलाच्या कामासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलने केली होती. त्यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती. पुलाच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल तथा विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. यामुळे दोन वर्षांपूर्वी या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती. आज त्याचे लोकार्पण करताना आनंद होत आहे.
यावेळी नीलम खताळ, पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, अविनाश थोरात, कैलास लोणारी, कैलास वाकचौरे, रामभाऊ राहणे, संदीप देशमुख, सागर भोईर, अल्पना तांबे, उषा कपिले, कांचन ढोरे आदी उपस्थित होते.