सांगली : सांगली व मिरज शहरात शनिवारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने सांगलीमध्ये चौकाचौकांत अहिल्यादेवींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून अभिवादन केले, तर अहिल्यादेवी स्मारकामध्ये विविध पक्षांच्या राजकीय नेतेमंडळींनी उपस्थित राहून अभिवादन केले.

राजमाता अहिल्यादेवी यांची त्रिशताब्दी जयंती असल्याने कार्यकर्त्यांनी संजयनगर, अभयनगर, राम मंदिर, बस स्थानकासह विविध ठिकाणी खास शामियाना उभा करून पुतळ्याची प्रतिष्ठापना करत अभिवादन केले. जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जयंती स्मारक उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा, ओव्या यांचा समावेश होता. स्मारकाच्या ठिकाणी आज दिवसभर अभिवादनासाठी गर्दी झाली होती. खा. विशाल पाटील, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, आ. सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, संजय बजाज आदींनी स्मारकाच्या ठिकाणी उपस्थित राहून अहिल्यादेवी यांना अभिवादन केले. या वेळी माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या पुढाकाराने महाप्रसादासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरज येथे माजी महापौर संगीता खोत यांच्या पुढाकाराने अहिल्यादेवींची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी रेखाटलेल्या रांगोळीचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी आ. सत्यजित देशमुख, मकरंद देशपांडे उपस्थित होते.