सांगली : पावसाने गेल्या २४ तासांपासून शिराळा तालुक्याचा अपवादवगळता सगळीकडे उघडीप दिली असली, तरी पावसाअभावी रखडणाऱ्या खरिपाच्या पेरण्या या वर्षी रोहिणी नक्षत्रातील जोरदार पावसाने लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अपेक्षित सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने द्राक्षाची काडी पक्व होण्यास आणि घडनिर्मितीस पोषक वातावरण नसल्यामुळे द्राक्ष बागा वांझ जाण्याची भीती वर्तवली जात आहे. शेतात जमा झालेल्या पाण्यामुळे पेरणीपूर्व मशागतीही रखडलेल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वच भागात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. जोरदार पावसाने शेतातील नाले, चरी, विहिरी, ओढे ओसंडून वाहत होते. ऊस, सोयाबीनसह अनेक पिकांचेही मोठे नुकसान झाले, तर अनेक रस्त्यांना अक्षरश: जलसमाधी मिळाली होती. शेतीकामासाठी महत्त्वपूर्ण असलेले पाणंद रस्ते जलमय झाले असून, वाहतूक करताच येत नाही अशी स्थिती आहे.
सततच्या पावसाने रानात पाणी शोषून घेण्याची क्षमताच संपली असल्याने थोडा जरी पाऊस झाला, तरी पिकात पाणी उभे राहत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकासह द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल छाटणीनंतर ६० दिवसांनी द्राक्ष बागांमधील काडीमध्ये फळ निर्मितीची म्हणजेच गर्भधारणेची प्रक्रिया सुरू होते. या काळात सूर्यप्रकाशाची गरज असते. दर वर्षी मे महिन्यातील प्रखर सूर्यप्रकाश मिळत असल्याने फळधारणा चांगल्या पद्धतीने होते. तर वेलीची काडी गव्हाळ रंगाची होण्याची म्हणजेच पक्वतेची शक्यता निर्माण होते. मात्र, या वर्षी ही प्रक्रिया सुरू होण्यादरम्यानच पावसाने मुक्काम ठोकल्याने द्राक्षाची गर्भधारणा होण्यात अडथळे निर्माण झाल्याने हंगामात बागा वांझ जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
खरीप पेरणीसाठी दर वर्षी मृग नक्षत्राचा पाऊस फारसा उपयुक्त ठरत नव्हता. या वर्षी रोहिणी नक्षत्राचा जोरदार पाऊस झाल्याने पेरणीपूर्व मशागत करून मृगाचा पेरा साधण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, सलग दहा दिवस पडणाऱ्या पावसाने शेतात पाणी जमा झालेले आहे. यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी संधीच मिळालेली नाही. यामुळे यंदाही खरीप पेरणीसाठी आर्द्रा नक्षत्राची प्रतीक्षा आणि घात येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी शिराळावगळता अन्य तालुक्यांत पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. शिराळा तालुक्यातील शिराळा, शिरसी, मांगले आणि चरण मंडळात पाऊस झाला असून, तालुक्यात सरासरी १३ मिमी आणि जत तालुक्यात मुचंडी मंडळामध्ये १४.३ मिमी पाऊस झाला असल्याचे पूरनियंत्रण कक्षातून गुरुवारी सांगण्यात आले.