Sanjay Raut on Raj and Uddhav Thackeray Protest Against Hindi Imposition : राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मोदान असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. या मोर्चात शिवसेना (ठाकरे) देखील सहभागी होणार आहे. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज व उद्धव ठाकरे एकत्र या मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील मोर्चासाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू राजकारणात हात मिळवणार का? मराठी अस्मिता हा राज व उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “राज व उद्धव ठाकरे हे मनाने एकत्र आलेलेच आहेत. सध्या भाषा हा महत्त्वाचा विषय आहे. मराठी अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी मुंबईवरील आक्रमणाविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं”.

“ठाकऱ्यांनाच या लढ्याचं नेतृत्व करावं लागेल”

संजय राऊत म्हणाले, “आपण याआधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र आलो होतो. त्याच प्रकारचा लढा उभारण्याची आज देखील गरज आहे असं दोन्ही ठाकऱ्यांना वाटतं. यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. मराठीविरोधात, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी, मुंबईतील मराठी माणूस हद्दपार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ६५ वर्षांपूर्वी असेच प्रयत्न होत होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र कृती समिती स्थापन झाली आणि सर्व पक्षांनी, संघटनांनी मिळून लढा दिला. तसाच लढा आता देखील द्यावा लागेल. या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकऱ्यांनाच करावं लागेल. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व पक्ष व संघटनांना निमंत्रण पाठवणार आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांना आम्ही या मोर्चाचं निमंत्रण देऊ. कारण हा काही राजकीय लढा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हिंदीच्या सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचीही तीच भूमिका आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि मराठीसाठी एकत्र या असं आवाहन दोन्ही ठाकऱ्यांनी सर्वांना केलं आहे. हेच महाराष्ट्राच्या हिताचं आहे आणि मराठी माणसाच्या मनातही तेच आहे”.