“शिंदे गटातील आमदार, खासदार हे रोज गुंड टोळ्याबरोबर चाय पे चर्चा करत आहे. त्यामुळेच अशा हत्या आणि अपहरणाचे गुन्हे घडत आहेत. शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठीच फडणवीस यांना गृहमंत्रीपद दिले आहे का? असे नसेल तर गुंडांना पाठिशी घालणाऱ्यांना तुरुंगात टाका”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य सरकारचे हे अपयश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यांनी आमच्या माथी हे शासन लादले, त्यामुळे गावागावात गुन्हे वाढले आहेत. मोदी-शाह यांनी हे सरकार आमच्यावर लादल्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
मॉरिस नरोन्हाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध? पूर्ववैमनस्यातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या टोळीत गुंड आणि पोलिसांचा समावेश केला आहे. मुंबई आणि ठाण्यासह प्रमुख शहरांत ज्या पोलिसांच्या नेमणूका केल्या गेल्या आहेत. ते सर्व शिंदे टोळीचे सदस्य आहेत. पोलीस जर पोलिसांसारखे वागणार नसून जर खाकी वर्दीतील गुडांप्रमाणे वागत असाल तर या राज्यातील जनता दूधखुळी नाही. कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात शिंदे पिता-पुत्रांचे नाव घेण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी ताबडतोब चौकशी करायला हवी. गणपत गायकवाड यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊनही मुख्यंमत्र्यांच्यी साधी चौकशी होत नाही. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आले, दिल्लीत केजरीवाल यांची चौकशी सुरु आहे. पण महाराष्ट्रात शिंदेंना साधा जाबही विचारला जात नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
गृहमंत्री कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत
संजय राऊत पुढे म्हणाले, काल शिवसेनेतील आमचे जवळचे सहकारी, कडवट शिवसैनिक विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. गेल्या दीड वर्षात फक्त गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहेत. पुण्यामध्ये मोहोळची हत्या झाली. नगरमध्ये आमदार गुंडगिरी करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत. राहुरीमध्ये आढाव वकील दाम्पत्याची हत्या झाली. मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अदृश्य आहेत. त्यांनी कुठे असायला हवे? मात्र फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांन घेऊन चाय पे चर्चा करत आहेत. त्यांनी राज्याच्या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करायला हवी.
“…आणि मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या”, प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी सांगितला थरार
दीड वर्ष खोके खाल्ले, आता बाजूला व्हा
“मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. म्हणजे आणखी १००-२०० गुंड शुभेच्छा देण्यासाठी येतील. राज्यात राजरोसपणे हत्या होत असताना मुख्यमंत्री वाढदिवस काय साजरे करत आहात?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. आजच्या दिवशी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की, दीड वर्ष मुख्यमंत्री पद भोगलं, महाराष्ट्राची वाट लावली, आता बाजूला व्हा. दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्राची वाट लावली. खोके जमले, खोके वाटले. आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं, आता बास करा, असेही संजय राऊत म्हणाले.