Sanjay Raut : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. आता कुठलाही संदेश नाही तर थेट बातमी देणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. तसंच महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. या सगळ्याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भूमिका मांडली आहे. तसंच सामनात छापून आलेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नाला थेट उत्तर दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी संदेश देणार नाही तर बातमी देईन. हे एकदा उद्धव ठाकरेंनी सांगितल्यावर कुठलीही शंका यायला नको. आमच्या सगळ्यांच्या मनात, मराठी जनतेच्या मनात जे आहे तेच होईल. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती अगदी फिक्स का? हे विचारलं असता राऊत म्हणाले, “महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नाही. भाजपा उपऱ्यांचा पक्ष आहे. तो शेठजींचा पक्ष आहे त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्र अस्मिता यांच्याशी काही घेणंदेणं नाही. आम्ही उरलेले लोक आहोत ते १०६ हुतात्म्यांशी बांधिलकी ठेवून काम करणारे आहोत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचेच शिष्य आहोत. महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त राष्ट्राच्या लढ्यात अनेक पक्ष एकत्र आले. त्यावेळी मराठी माणसाचा विजय झाला. आता त्याच प्रकारचं वातावरण भाजपाने निर्माण केलं आहे. त्यामुळे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज हे सांगणाऱ्या पक्षांना एकत्र यावं लागेल” असं संजय राऊत म्हणाले.

Raj Thackeray and Uddhav Thackeray Came Together
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र (फोटो-फेसबुक )

सामनात आलेल्या फोटोबाबत काय म्हणाले संजय राऊत?

सामनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो आला आहे त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, मराठी माणूस म्हणून कुणाच्या मनात नाही की त्या दोघांनी एकत्र यावं? महाराष्ट्र द्रोही जे आहेत ज्यांचं केंद्र दिल्ली आणि अहमदाबाद आहे अशांचा पाडाव करावा असं कुणाला वाटणार नाही? असं संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या गोष्टींमध्ये आम्हाला रस नाही-राऊत

मागच्या गोष्टी कोण काढतं आहे? त्यात मला रस नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहात नाही. आम्हीही मागे वळून पाहात नाही. २०१७ मध्ये काय झालं? २०१४ मध्ये काय झालं? १८५७ ला तुमचा विचार असा होता, १६२२ मध्ये काय घडलं? या गोष्टी आम्ही बघत नाही. किती मागे जाणार? भविष्याकडे पाहा ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचं संपवण्याचं हे काम एसंशि गट, देवेंद्र फडणवीस, अमित शाह हे सगळे करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय अगाध आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता नवी गीता लिहित आहेत. आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मेहराबानीने आम्ही मुख्यमंत्री झालेलो नाही. हाताशी यंत्रणा असणं पोलीस, ईडी, सीबीआय म्हणजे मी सर्वेसर्वा असा त्याचा अर्थ होत नाही. असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.