Sanjay Raut Book Narkatla Swarg: शिवेसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर तब्बल शंभरहून अधिक दिवस ऑर्थर रोड कारावासात घालवावे लागले होते. कारावासातील आठवणींवर राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या बहुचर्चित पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी या पुस्तकातील काही मजकूर माध्यमात आला असून त्यावर आता संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. ईडीने अटक करण्याआधी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. तसेच एकनाथ शिंदे यांनीही फोन केल्याचा दावा संजय राऊत यांनी या पुस्तकात केला आहे.

संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुस्तकातील मजकुराविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “माझी अटक होण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. कारण मुख्य विरोधकाला त्रास देण्यासाठी त्याच्या आसपासच्या लोकांना लक्ष्य केले जाते, अशी सरकारची भूमिका असते. माझ्याबरोबर हेच झाले. माझे नातेवाईक, मित्र यांना त्रास दिला गेला. याचे मला वाईट वाटत होते. अनेकांना आठ-दहा तास बसवून ठेवले गेले. जसा यमदूत येऊन उचलून नेतो. तशाप्रकारे यंत्रणाचे लोक येऊन लोकांना घेऊन जातात. जसे काही आम्ही डॉन आहोत, असा त्यांचा रोख असतो.”

म्हणून अमित शाहांना फोन केला

संजय राऊत पुढे म्हणाले की, माझ्याशी संबंधित लोकांचा छळ केल्यामुळे मी रात्री ११ वाजता अमित शाहांना फोन केला. तुम्ही मला त्रास द्या, पण माझे मित्र, नातेवाईक यांचा यंत्रणामार्फत छळ करू नका, असे त्यांना सांगितले. तुमच्या मंजुरीशिवाय हे होत आहे, हे मानायला मी तयार नाही. मी दिल्लीतच बसलो आहे. जर मला अटक करायची असेल तर ईडीची टीम इथे पाठवा. पण ही नौटंकी बंद करा, असे सांगून मी फोन ठेवल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

अमित शाहांशी बोलून झाल्यानंतर मला आशिष शेलारांचा फोन आला. अमित शाहांनी त्यांना निरोप दिला असल्यामुळे त्यांनी मला फोन केला. मला फासावर लटकवा, पण कारण नसताना माझ्याशी संबंधित लोकांना त्रास देऊ नका, असा मुद्दा त्यांच्यासमोरही मांडला. तसेच तत्कालीन ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित मोठा घोटाळा उघड केल्याचे पंतप्रधान मोदींना सांगत होते. मात्र त्यातील फोलपणा नंतर समोर आला. या पुस्तकात त्याबद्दल विस्तृत लिहिलेले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंचा अटकेआधी फोन

मला अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंनी फोन करून ‘वर बोलू का’, असे मला सांगितले होते. पण मी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. वर बोललात तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही, असे मी ठामपणे सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या पुस्तकाला बाल साहित्य म्हटले होते. त्यावरही राऊत यांनी टीका केली. “फडणवीस यांनी बाल साहित्याचा अपमान केला आहे. या साहित्याला राज्य सरकारकडून पुरस्कार दिला जातो. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कारही दिला जातो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एवढेच त्यांचे महत्त्व बाकी काही नाही”, अशी टीका राऊत यांनी केली.