भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात. या नामर्दपणाला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री स्वतः शिवाजी पार्क येथे आले होते. ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये केली त्यांना चपराक बसली आहे. त्यांच्या अंतर्गत किती घाण आणि कचरा आहे हे स्पष्ट झाले आहे. मी वारंवार सांगत होतो की मुख्यमंत्री येणार आहेत. आजारपण कोणवर येईल सांगता येत नाही. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा अशा गंभीर दुखण्यातून जात होते तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. मुख्यमंत्र्याचे दर्शन झाल्याने राज्याची जनता उस्ताहात आणि आनंदात आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले. “विरोधी पक्षांनी एकप्रकारची नामर्दानगी आणली आहे. मोठ्या मनाच्या राजकारणाचा विरोधी पक्षांकडून ऱ्हास होत आहे. नामर्दानही हा शब्द भाजपाने आणला आहे म्हणून मी तो शब्द वापरत आहे. चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती हे सांगालया नको,” असेही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईच्या शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्पूर्वी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले. तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्षात एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवर जाण्यापूर्वी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहण केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रियेनंतर २ डिसेंबरला उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून काम पाहत होते. यावेळी सर्व प्रशासकीय कामे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांना उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच हजेरी लावली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीलाही ते गैरहजरी लावल्याने विरोधकांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांना जमत नसल्यास त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज तात्पुरता दुसऱ्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणीही भाजपाच्या नेत्यांनी केली होती.