गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातलं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. त्यामध्ये नारायण राणेंनी उडी घेत संजय राऊतांवर साधलेल्या निशाण्याचीही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवजयंतीच्या निमित्ताने संजय राऊतांनी केंद्र सरकारवर आणि पर्यायाने भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. “दिल्लीनं इकडचे लोक फितुर केले असून ते आमच्या मराठी बाण्यावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत”, असं राऊत म्हणाले आहेत.
“दिल्लीसमोर झुकणार नाही…”
यावेळी संजय राऊतांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण देताना आपण दिल्लीसमोर झुकणार नसल्याचं प्रतिपादन केलं आहे. “छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला, ती म्हणजे स्वाभिमान. मरण पत्करेन, पण शरण जाणार नाही हा जो बाणा शिवरायांचा आहे, तो महाराष्ट्रानं कायम जपला. आजही आम्ही दिल्लीसमोर ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत. दिल्लीपुढे झुकणार नाही आणि शरण जाणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्रातले काही फितुर आणि गद्दार…”
“तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज दुसरे कुणी असतील. दिल्लीनं कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा हा प्रयत्न झाला, तेव्हा महाराष्ट्रानं उसळून म्यानातून तलवार काढून लढा दिला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्र लढतोय. त्या काळातही महाराष्ट्रातलेच काही फितुर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते. शिवरायांविरोधात कारस्थानं करत होते. आजही नेमकी तीच परिस्थिती आहे”, असंही राऊत म्हणाले.
“सह्याद्री हिमालयाच्या बरोबरीने लढत राहील”
“दिल्लीनं इकडचेच लोक फितुर केले आहेत. ते फितुर, बेईमान लोक आमच्या मराठी बाण्यावर, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत. पण तरीही महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्र लढत राहील. हा सह्याद्री आहे. हिमालयाच्या बरोबरीने लढत राहील. हिमालयाचं रक्षण करणं सह्याद्रीचं प्रथम कर्तव्य आम्ही मानतो. कुणी महाराष्ट्राला कमजोर करत असेल, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा”, असं राऊत म्हणाले.
“…याचा अर्थ वेट अँड वॉच”, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सूचक प्रतिक्रिया!
“आजही औरंगजेब, सूर्याजी पिसाळ, जयचंद आहेत. ते महाराष्ट्रातच आहेत. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही प्रिय आहेत. ज्यांनी मुंबईतल्या शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध केला, असे लोक औरंगजेबाचे इथले हत्यार आहेत. हे महाराष्ट्रद्रोही. त्यांच्या पाठिशी इथले गद्दार आणि दिल्लीतं तख्त उभं आहे. आणि हे तख्त फोडण्याची ताकद महाराष्ट्रात आहे”, असा इशारा राऊतांनी यावेळी बोलताना दिला.