महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेतील दोन गट पक्षनाव-चिन्ह व आमदार अपात्रतेसंदर्भात एकमेकांसमोर उभे ठाकले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हेच मुद्दे आता उपस्थित झाले आहेत. अजित पवार गटाच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षनाव व पक्षचिन्ह कुणाचं? हा वाद निवडणूक आयोगासमोर उभा राहिला आहे. या वादावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार असून त्यातून आपल्याच बाजूने निकाल येईल, अशी अपेक्षा दोन्ही गटांना आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भूमिका मांडली. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे परखड टीका केली. काय म्हणाले संजय राऊत? शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना एकाच निर्णयाच्या आधारे न्याय मिळेल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. "आमच्या प्रकरणातही निवडणूक आयोगाला निकाल फिरवावा लागेल. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलंय की आमदार-खासदारांची फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. हाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला व आम्हालाही लागू होईल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था राजकीय दबावाखाली काम करतात. राज्यकर्त्यांना हवे तसे निर्णय हवे तेव्हा देतात. या देशाच्या राजकारणाला लागलेली ही कीड आहे. ती केव्हातरी नष्ट करावीच लागेल", असं संजय राऊत यावेळी म्हणाले. "आज निवडणूक आयोगाची खरी कसोटी" "आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. शरद पवार दिल्लीत आले आहेत. ते आजच्या सुनावणीला उपस्थित राहतील असं दिसतंय. निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांसमोर सुनावणी होते. ज्या पक्षाच्या अध्यक्षावरच समोरच्या व्यक्तीने खटला दाखल केला आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष समोर बसलेले असताना निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल? शरद पवारांनी पक्ष स्थापन केलाय. त्यांनी लोकांना पदं दिली, निवडून आणलं. कुणीतरी ऐरागैरा समोर उभा राहतो आणि सांगतो हा त्यांचा पक्ष नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी आहे", अशा शब्दांत संजय राऊतांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले? आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत; म्हणाले, “रक्ताच्या…… "महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय" नक्षलवादाच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांनी टीका केली. "नाव नक्षलवादाचं आहे, पण कारणं वेगळी आहेत. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय गेल्या चार दिवसांत १०० हून जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ करत नसेल, तर मला वाटतं त्यांचं मन व ह्रदय मेलेलं आहे. दिल्लीवाल्यांच्या मन की बात ते ऐकायला येतात. पण नांदेड, संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत जे मृत्यूचं तांडव सुरू आहे, त्यांचा आक्रोश त्यांना ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेतठ, असं राऊत म्हणाले. संजय राऊत कोर्टात जाणार "यांच्या दबावाखाली पोलीस गुन्हे दाखल करतात. ज्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत, अशा गुन्हेगाराला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी तु्म्ही नेमता. मी त्यातला पीडित आहे. माझा फोन टॅप केला होता. अशा पोलिसांच्या हाती तपास असेल तर तुम्ही यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता? मी कोर्टात जातोय. अशा व्यक्तीला तुम्ही पोलीस महासंचालक नेमता? माझं कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. पण पोलिसांना आव्हान आहे, २०२४ साली तुम्हाला या सगळ्या खोट्या गुन्ह्यांचा जबाब द्यावा लागेल", अशा शब्दांत त्यांनी रश्मी शुक्ला प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.